शब्द लहरी

 

      

 शब्द लहरी 

-------------------------------------------

   निसर्ग

मानवजातीच्या विकासात निसर्गाचा मोठा वाटा आहे. प्राचीन काळातील पाषाण युगापासून आजच्या नवीन युगापर्यंत, प्रत्येक प्राणी झाडे आणि वनस्पतींवर अवलंबून राहून जीवन जगत आला आहे. झाडांपासून इतर बऱ्याच मौल्यवान वस्तू बनतात,तुळस,आवळा,कडुनिंब अशी अनेक झाडे औषधे म्हणून वापरली जातात.पृथ्वीवर पावसाचे मुख्य कारण म्हणजे झाडे,ज्यामुळे शेती व इतर घरगुती कामांसाठी पाणी उपलब्ध होते. झाडांमुळे वातावरणातील संतुलन कायम राहते. झाडे आणि वनस्पती पृथ्वीवर सर्वात शुद्ध वातावरण तयार करतात. झाडांमुळे वायू प्रदूषण, जल प्रदूषण आणि भूमि प्रदूषण कमी होते.

सौ.प्रतिमा अरुण काळे
निगडी प्राधिकरण पुणे,४४

------------------------------------------------------
 व्यक्त  आणि अव्यक्त

व्यक्त आणि अव्यक्त आयुष्याचे दोन कंगोरे..
     व्यक्त उधळून देत राग, रंग, प्रेम, कटुता सगळंच. ताठ मानेने, निर्भीड छातीने. संकुचितपणा त्याला माहित नसतो. जे आहे, जसं आहे तस भिरकावण हाच त्याचा शिरस्ता.
     अव्यक्त नेहमीच झाकलेलं, झाकाव लागणार  कधी स्वतःसाठी कधी इतरांसाठी  सतत संकुचित, सतत कुढत राहणार. जगण्यालाच चौकट निर्माण करणार आणि खुलेआम जगू  न देणार.
    कस जगाव? व्यक्त की अव्यक्त. 
     जगावं तर व्यक्तच.... अव्यक्ताच्या काळोखात बुडून एकांतात घुसमटून राहण्यापेक्षा.अव्यकतात उणीवाच अधिक असतात. अव्यकताच आयुष्यावर ओझं बनू नये.
     अव्यक्त असावं गाठीला पण ते कस्तुरी सारखं सुगंधित, सतत सुखाचा भास देणार. बरोबरीने चालून आयुष्याला बहरू देणार. असंही अव्यक्त व्यक्तित्वाला अंतरंगातून खुलवणार.

   स्मिता डोंगरे नलावडे
--------------------------------------
 ऑनलाईन शिक्षण पद्धती 

          आपल्या जडणघडणीच्या जीवनात प्रत्येक गोष्ट ही परिस्थितीनुसार घडत असते. जसे की विज्ञानाच्या दृष्टीने बदलत्या वातावरणाचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो, थोडे जरी वातावरणात बदल जाणवले तरी आपल्या शरीराची हालचाल बदलत असते. तसेच या विज्ञानाच्या अनुषंगाने आपल्यालाही परिस्थितीनुसार दैनंदिन जीवनात काही बदल करावे लागतात. पण हे बदल काही ठराविक काळापुरते मर्यादित असतात. तसेच ऑनलाईन शिक्षणाचे ही आहे. आताची उद्धभवलेली परिस्थितीच अशी आहे की ऑनलाईन शिक्षणाशिवाय दुसरा तरणोपाय नाही. बदलत्या काळानुसार, परिस्थितीनुसार माणसाने बदलने अपेक्षित आहे. बदलत्या काळानुसार, आता आपणही पुढे सरकले पाहिजे. आतापर्यंत जगामध्ये अनेक बदल झाले. अथवा अजूनही होत आहेत. कालांतराने ही ऑनलाईन पद्धत अस्तित्वात आली याचा जगाला, माणसाला, फायदाच झाला आहे. 
परंतु ऑनलाईन शिक्षणाचा विचार केला तर ऑनलाईन शिक्षण ही पद्धत चुकीची आहे असे म्हणता येणार नाही.
          गेल्या 1 वर्षापासून संपूर्ण जग कोरोना व्हायरस सारख्या संकटाचा सामना करत आहे. जे अद्याप ही निवळले नाही. या रोगाचा वेगाने प्रसार होत असल्याकारणाने बाहेर पडणे जिकिरीचे ठरत आहे. अशा अवस्थेत सरकारने जे संचारबंदीचे पाऊल उचलले आहे ते अतिशय योग्य आहे. मान्य आहे सर्व शाळा, कॉलेज, बंद आहेत. परंतु शेवटी सरकारलाही विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता आहे त्यासाठीच सरकारने ऑनलाईन शिक्षण सुविधा सुरू केली. त्यामागचा उद्देश एकच आपल्या देशातील एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होता कामा नये. शिक्षण तर चालू ठेवायचे आहे. परंतु कोरोना व्हायरस संसर्गामुळे विद्यार्थ्यांना शाळेत बोलवायचे नाही. मग शिक्षण कसे पुढे ठेवणार? विद्यार्थ्यांचे शिक्षण कसे पूर्ण होणार? असे सर्व प्रश्न सरकारपुढे असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. 
          मान्य आहे काही ऑनलाईन शिक्षणाला खूप खर्च आहे, रोजच्या इंटरनेट साठी पैसे मोजावे लागतात, मुले घरात बसून बसून एकलकोंडी झाली आहेत. त्यांना मोकळ्या वातावरणाची सवय राहिली नाही. पण ही सुद्धा परिस्थिती सुधारेल, कधी ना कधी पहिल्यासारखे होणारच आहे. 
परंतु या पलीकडे जाऊन विचार केल्यास मला असे वाटते त्याचा पुढे येणाऱ्या विद्यार्थी वर्गाला तसेच देशात वाढत चाललेल्या बेरोजगार युवक वर्गाला अधिक फायदा आहे. या ऑनलाइन शिक्षणामुळे इतर महागात असलेले अभ्यासक्रम जे सामान्य लोकांना न परवडणारे आहेत ते डिस्काउंट मधे, ऑफर सुविधेत पूर्ण होताना दिसतात. ज्या उच्च शिक्षित तरुण वर्गाला हवे असलेले अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी बाहेरगावी जावे लागत नाही. ते घरबसल्या ऑनलाईन स्वरूपात पूर्ण करता येतात. ऑनलाईन नोकरीच्या अनेक संधी निर्माण होतात.  जर या ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे नशीब उजळणार असेल तर हे ऑनलाईन शिक्षण प्रणाली या पुढे ही अशीच निर्विकारपणे सुरू राहिली तरी हरकत नाही. काय वाटत? बरोबर ना.......... 

लेखक : नयन धारणकर, नाशिक
------------------------------------------------
 ज्ञानेश्वरीतील   सुंदर  प्रतिमाने


          की  प्राप्त कर्म  सांडीजे । ये  तुलेनि  नैष्कर्म्य  होईजे  ।  हे  अर्जुना  वायां  बोलिजे ।  मुर्खपणे ।।

       सांगै   पैलतीरां  जावे  ।  ऐसें  व्यसन
कां  जेथ  पावे । तेथ  नावे  तें  त्यजावे ।
घडे  केवी  ? ।।

             ना  तरी तृप्ती  इच्छिजे ।  तरी
कैसेनि  पाकु  न  कीजे  । कीं  सिद्धुही
न  सेविजे  ।  केवी  सांगै  ?


             अरे  अर्जुना  ! जी  ज्याला  
वेदरहित  कर्मे  आहेत  फक्त  ती  टाकावीत   व  तेवढ्यानेच  नैष्कर्म्य -क्रुतार्थ  व्हावे .असे  म्हणणे  निव्वळ
मुर्खपणाचे  आहे .

          पहा  नदी  दुथडी  भरली  आहे. व
ती  उतरून  पलीकडे  जाण्याची   तीव्र
आवश्यकता  आहे.  तेथे  नावेचा  त्याग
करून  जाऊ  म्हटले  तर कसे  जाता
 येईल  ?

            किंवा  भोजनापासून  ज्यास
तृप्तीची  इच्छा  आहे  त्याला  स्वयंपाक
न  करून  कसे  चालेल ?  सांगा  बरे ?


सौ.  शैलजा  जाधव (पाटील)
           चांदवड   नासिक
-----------------------------------------------

 विचारधारा

नवरात्रीच्या नऊ दिवसात प्रत्येकांनी मातेपुढे एक संकल्प करावा की, आजपासून व, समोर सुद्धा मी, कोणत्याही पर स्त्रीयांना छेडणार नाही. तर तिला माणुसकीच्या नात्याने रक्षक बनून आपला माणुसकी धर्म पूर्णपणे पार पाडणार... तेव्हाच तर खरी मातेची पूजा करण्याचा काहीतरी फायदा होईल नाही तर...  कितीही पूजापाठ करून काहीही मिळणार नाही  सारं काही व्यर्थ गोष्टींच्या खात्यात जमा  होऊन जाईल...

सौ. संगीता संतोष ठलाल
मु. कुरखेडा जि. गडचिरोली

टिप्पण्या

news.mangocity.org