शेतकरी हवालदिल
शेतकरी हवालदिल
हिरव्या मिरचीचे भाव कोसळले, टोमॅटोचा दर दोन रुपये किलोवर
आठवडाभरात हिरव्या मिरचीचे भाव साडेतीन ते चार हजार रुपयांवरून पाचशे ते पंधराशे रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई या गावात तसेच जाफराबाद या तालुक्याच्या ठिकाणी हिरव्या मिरचीच्या खरेदी-विक्रीच्या बाजारपेठा आहेत. या दोन्हीही बाजारपेठांमध्ये ठोक खरेदीचे भाव मोठय़ा प्रमाणावर घसरल्याने कांही शेतक ऱ्यांनी मिरच्या रस्त्यावर फेकून दिल्याच्याही घटना घडल्या आहेत.
भोकरदन आणि जाफराबाद या एकमेकास लागून असलेल्या दोन्ही तालुक्यात मिरचीची लागवड मोठय़ा प्रमाणात केली जाते. त्यामुळे या भागातच दोन ठिकाणी मिरचीचे ठोक खरेदीचे व्यवहार गेली अनेक वर्षे केले जातात. महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यातील व्यापारी या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात. मिरची लागवड आणि मशागतीसाठी खर्च तर लागतोच, परंतु त्यासोबत तोडणीसाठीही खर्च लागतो. काही भागात तोडणीसाठी मजूर बाहेर गावातून आणावे लागतात. काही शेतक ऱ्यांच्या उत्पादनातून तोडणीएवढाच खर्च निघू शकेल, अशी अवस्था ठोक बाजारातील भाव कोसळल्यामुळे झाल्याचे सांगण्यात येते.
जाफराबाद येथे कमी भावाने मिरची खरेदी करण्याच्या प्रश्नावरून शेतकरी आणि व्यापाऱ्यांत वाद झाला. त्यामध्ये तीन शेतक ऱ्यांना मारहाण झाली. या गोंधळाची चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित झाली. त्यानंतर जाफराबाद बाजारपेठेतील खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद पडले. भोकरदन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संतोष ठाले यांनी ‘लोकसत्ता’स सांगितले,की दरवर्षी साधारणत दोन-अडीच महिने हिरव्या मिरचीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार पिंपळगाव रेणुकाई येथे होतात. या वर्षीच्या हंगामात प्रारंभीच्या काळात चार ते पाच हजार रुपयांदरम्यान प्रतिक्विंटल भाव शेतक ऱ्यांना मिळत होता. आवक वाढल्यानंतर हा भाव पंधराशे रुपयांत आला. हंगामाच्या काळात रेणुकाई पिंपळगाव बाजारातून दररोज जवळपास शंभर लहान-मोठी हिरव्या मिरचीची वाहने खरेदी करून बाहेर जातात. या वर्षीच्या हंगामात खरेदीचे भाव कोसळल्याने मिरची उत्पादक शेतक ऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झालेली आहे.
टोमॅटोचे भाव कमालीचे घसरल्याने काढणीचा खर्चही निघत नाही त्यामुळे गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरभर टोमॅटो रस्त्यावर फेकून आंदोलन केले. २५ किलो टोमॅटोसाठी केवळ १०० रुपयांचा दर मिळत असल्याने अडचणीत भर पडू लागली आहे. गंगापूर येथे लासूर स्टेशन परिसरात अलिकडेच टोमॅटो लागवड वाढली असून शेतकरी हैराण झाले आहेत. टोमॅटोचे दर कायम राखायचे असतील तर त्यावरील प्रक्रिया उद्योग उभारणीची गरज आहे. तसे पत्र या भागातील शेतकऱ्यांनी थेट रतन टाटापर्यंतही पाठविले आहे. गंगापूर तालुक्यातील गवळीशवरा, फलशवरा या गावात टोमॅटो लागवड वाढली आहे. जवळपास ३०-४० गावात टोमॅटो लागवड वाढली आहे. या पिकास अंगमेहनत अधिक असते. तसेच काही वेळा कीड नियंत्रणासाठी फवारण्याही कराव्या लागतात. त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो. दिल्ली, जयपूपर्यंत टोमॅटो विक्रीसाठी जात होता. दर उतरल्याने वाहतूक परवडत नसल्याचे शेतकरी रवींद्र रावासाहेब चव्हाण यांनी सांगितले. आपल्या भागात उद्योग यावा यासाठी आता शेतकरीही उद्योजकांना पत्र लिहू लागले आहेत. टाटा उद्योग समूहाने टोमॅटो आणि मका क्षेत्रात उतरावे. गंगापूर तालुक्यात कोठेही प्रक्रिया उद्योग सुरू करावा अशी मागणी करण्यात येत आहे. नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गावरील गावांभोवती भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची संख्या वाढत असून दर नियंत्रणासाठी प्रक्रिया उद्योगाची मागणीही केली जात आहे. टोमॅटोचे दर आता कमालीचे घसरत असल्याने त्याची वाहतूक करून बाजारपेठेत नेण्याऐवजी जनावरांसमोरही ते टाकले जात आहेत. या प्रश्नी लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी आंदोलन करण्यात आले.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा