अफगाणिस्तानातून आणखी ७८ जण भारतात


अफगाणिस्तानातून आणखी ७८ जण भारतात

अफगाणिस्तानातून आणखी ७८ जण भारतात


नवी दिल्ली : भारताने मंगळवारी ७८ लोकांना मायदेशी आणले असून त्यात २५ भारतीय व इतर अफगाणी शीख लोकांचा समावेश आहे. त्यांना दुशान्बे येथून आणण्यात आले. त्यांना काबूल येथून ताजिकिस्तानातील या शहरात आणण्यात आले होते.

गुरु नानक साहिबचे तीन ग्रंथ असलेल्या गटाला दुशान्बे येथून लष्करी विमानाने देशात आणण्यात आले, असे भारतीय हवाई दलाने सोमवारी म्हटले होते. मंगळवारी पुन्हा या मोहिमेत  मायदेशी आणण्यात आलेल्या लोकांमुळे १६ ऑगस्टपासून सुटका करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या आता आठशेवर गेली आहे.

तालिबानने काबूलवर कब्जा केल्यानंतर १६ ऑगस्टला पहिल्यांदा लोकांच्या पहिल्या गटाची सुटका करण्यात आली होती. आज ज्यांना भारतात आणण्यात आले त्यांचे इंदिरा गांधी विमानतळावर केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी व व्ही मुरलीधन यांनी स्वागत केले. एअर  इंडियाच्या विमानाने या लोकांना दुशान्बे येथून आणण्यात आले. या लोकांचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. त्यांच्याकडे गुरु ग्रंथसाहिबच्या तीन प्रती होत्या त्याही सुरक्षित आणण्यात आल्या आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, ७८ जणांना एअर इंडियाच्या विमानाने भारतात आणण्यात आले. त्यात २५ भारतीय नागरिक आहेत. सोमवारी १४६ जणांना चार विमानांनी भारतात आणण्यात आले होते ते त्यांना आधी कतारची राजधानी दोहा येथे आणण्यात आले होते. नाटो व अमेरिकी विमानांनी त्यांची सुटका केली होती.

‘पाकिस्तान जबाबदार’

 अफगाणिस्तानातील परिस्थिती पाकिस्तानमुळे बिघडली असून तेथे महिलांचा छळ चालू आहे असे अफगाणी पॉप स्टार आर्याना सईद यांनी म्हटले आहे. तिने सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी ताबा मिळवल्यानंतर तेथील लोकांनी पलायनासाठी संघर्ष सुरू केला आहे. तालिबान्यांनी देशावर ताबा मिळवताच महिलांचा छळ सुरू केला आहे. त्यामुळे महिलांना तेथे राहणे अवघड झाले आहे. तालिबानी लोक महिलांना बुरखा परिधान करण्याची जबरदस्ती करीत आहेत. नागरिकांचाही मोठय़ा प्रमाणात छळ सुरू आहे. तालिबान्यांना पाकिस्तानचा पाठिंबा असून त्याचे पुरावे देखील आहेत, असा दावा तिने केला आहे.

तालिबान्यांनी देश ताब्यात घेतल्यानंतर आर्यानाला सुटका करून घेण्यात यश आले आहे. अमेरिकी सैन्याच्या मदतीने तिने देश सोडला असून ती वॉशिंग्टनमध्ये सुरक्षितपणे परत आली आहे. अफगाणिस्तानातील परिस्थितीवर तिने म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय समुदाय पाकिस्तानवर दबाव आणू शकेल अशी आशा आहे. पाकिस्तानमुळे अफगाणिस्तानचा ताबा तालिबानने घेतला असून तालिबानला पाकिस्तान निधी पुरवत आहे.

पाकिस्तानमध्येच तालिबानी दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याचा आरोप करून ती म्हणाली की, पाकिस्तानला अमेरिकेने निधी देणे बंद केले, तर ते तालिबान्यांना अर्थपुरवठा करू शकणार नाहीत. सध्या अफगाणिस्तानात जे संकट उभे राहिले आहे, ते पाकिस्तानमुळे निर्माण झाले आहे. त्यामुळे यास मूळ जबाबदार देश पाकिस्तानच आहे.

....................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या

news.mangocity.org