मुंबई पालिके वर बुधवारी मच्छीमारांचा मोर्चा


मुंबई पालिके वर बुधवारी मच्छीमारांचा मोर्चा

मुंबई पालिके वर बुधवारी मच्छीमारांचा मोर्चा

क्रॉफर्ड मार्केट येथील मासळी बाजाराची इमारत धोकादायक असल्याने पाडण्यात आली.

मुंबई : मुंबईतील मासळी बाजारांचे मुंबईतच पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी मासेविक्रेते येत्या बुधवारी, २५ ऑगस्टला पालिका मुख्यालयावर मोर्चा काढणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज मासळी बाजार (क्रॉफर्ड मार्केट) आणि दादर येथील मीनाताई ठाकरे मासळी मंडईचे निष्कासन केल्यानंतर येथील विक्रेत्यांना ऐरोली येथे पर्यायी जागा देण्यात आली होती, परंतु त्यांनी तेथे जाण्यास नकार दिला आहे.

क्रॉफर्ड मार्केट येथील मासळी बाजाराची इमारत धोकादायक असल्याने पाडण्यात आली. तर दादर येथील मासळी बाजारही हटवण्यात आला. दोन्ही बाजारातील घाऊक विक्रेत्यांना आणि पुरवठादारांना ऐरोली येथे पाठवण्यात आले. तर दादर बाजारातील किरकोळ मासेविक्री करणाऱ्या महिलांना मरोळ बाजारात जागा दिली. या दोन्ही बाजारातील विक्रेत्यांचा पर्यायी जागांना विरोध आहे.

क्रॉफर्ड बाजारातील घाऊक विक्रेते ऐरोली येथे जाण्यास तयार नसून मुंबईत जमेल त्या जागेवर ते विक्री करत आहेत. कर्णाक बंदर परिसरातही त्यांनी विक्रीचा प्रयत्न केला. परंतु पोलीस प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई क रण्यात आली. तर दादर येथील मासे विक्रेत्या महिला थेट रस्त्यावरच विक्रीसाठी बसत आहेत.

बाजाराच्या दृष्टीने ऐरोली येथे कोणतीही व्यवस्था नाही. तसेच इतकी वर्षे मुंबईत असलेला बाजार ऐरोलीत गेल्याने व्यवसायाची गणितेही बिघडण्याची चिंता व्यावसायिकांना आहे.

अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती या आंदोलनाचे नेतृत्व करत असून मुंबई, पालघर आणि रायगड येथील अनेक मच्छीमार संघटना आणि विक्रेते  आंदोलनात सहभागी होणार आहेत.

मुंबईतला मासळी बाजार बाहेर नेण्याचा पालिकेचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. विक्रेत्यांनी वर्षांनुवर्षे इथे व्यापार केला आहे.  त्यांना उपजीविकेसाठी मुंबईतच जागा मिळायला हवी. 

– देवेंद्र तांडेल, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती

....................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या

news.mangocity.org