सणासुदीमध्ये नियमांचे पालन हवे! आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे नागरिकांना आवाहन

सणासुदीमध्ये नियमांचे पालन हवे!

सणासुदीमध्ये नियमांचे पालन हवे! आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे नागरिकांना आवाहन


 महाराष्ट्र: करोनाच्या तिसऱ्या लाटेत राज्यात ६० लाख नागरिकांना करोना संसर्गाची शक्यता केंद्र सरकारने व्यक्त केल्याने त्याला तोंड देण्यासाठी राज्य सरकारने पूर्ण तयारी केली आहे. केरळमध्ये ओणम साजरा करताना गर्दी केल्याने रुग्णसंख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातही आगामी सणासुदीला करोना नियमांचे पालन न केल्यास संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळे सणासुदीला गर्दी न करण्याचे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला केले आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी करण्यातयेत असलेल्या उपाययोजनांवर चर्चा झाली. त्याबाबत टोपे म्हणाले, मी केरळमधील रुग्णवाढीच्या कारणांविषयी तेथील आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली. तेथे एका दिवसात ३१ हजार रुग्णांची नोंद झाली आहे. केरळमध्ये ओणम साजरा करताना मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाल्याने व चाचण्यांची संख्या वाढविल्याने तेथे रुग्णसंख्या वाढली आहे.

राज्याने तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. पहिल्या लाटेत २० लाख, दुसऱ्या लाटेत ४० लाख नागरिकांना करोना संसर्ग झाला. आता तिसऱ्या लाटेत ६० लाख नागरिकांना संसर्ग होईल, अशी शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेत आठ ते दहा टक्के लहान मुलांना संसर्ग झाला होता. पूर्वानुभवाच्या आधारे त्याच्या १२ टक्के प्राणवायू सुविधा असलेल्या रुग्णशय्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या लाटेच्या वेळी साडेसहा लाख उपचाराधीन रुग्णांची सर्वाधिक संख्या होती. ती १३ लाख असेल, असे गृहीत धरुन तयारी करण्यात येत आहे. आरोग्य विभागातील सर्व रिक्त जागा भरण्यात येत आहेत. वर्ग क व ड कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी २५ व २६ ऑगस्टला परीक्षा होणार आहेत. नवीन १२०० डॉक्टरांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जागा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येत आहेत,असे टोपे यांनी सांगितले.

लसीकरणाबाबत..

लसीकरणाच्या मुद्यावरही मंत्रिमंडळात सविस्तर चर्चा झाली. राज्य सरकारने पाठपुरावा केल्याने केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यात  १ कोटी ७० लाख मात्रा देण्याचे मान्य केले आहे. लसीकरणाला गती दिली तर तिसऱ्या लाटेचे गंभीर परिणाम होणार नाहीत. अमेरिका, ब्रिटन व रशियात तिसरी लाट असूनही लसीकरणामुळे मृत्यूदर फारसा नाही. महाराष्ट्राने करोना मृत्यूंचे आकडे कधीही लपविले नसल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले.

राज्यात करोनाचे ५१०८ नवीन रुग्ण

राज्यात दिवसभरात करोनाच्या ५१०८ नवीन रुग्णांची नोंद झाली व १५९ मृत्यू झाले. दिवसभरात ४७३६ रुग्ण करोनातून बरे झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ५० हजार ३९३ इतकी झाली आहे.  गेल्या चोवीस तासांत मुंबईत ३९८, अहमदनगरमध्ये ६१८,पुण्यात ६५८, पुणे शहरात ३१६, पिंपरी-चिंचवडमध्ये १८९, सोलापूरमध्ये ४६०, साताऱ्यात ८२१,कोल्हापूरमध्ये ११९, सांगलीत ४६२, बीडमध्ये १०४, रत्नागिरीत ९५ इतकी नव्या रुग्णांची नोंद झाली.

..................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या

news.mangocity.org