प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत




 प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत


रत्नागिरी अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांचे प्रतिपादन


लायनेस  क्लब रत्नागिरी आणि रत्नागिरी वाहतूक पोलीस यांच्यावतीने आयोजीत ऑनलाईन निबंध स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ संपन्न


रत्नागिरी:-वाहतूक हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे.  मात्र योग्य खबरदारी आणि काळजी न घेतल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असून ही बाब अतिशय गंभीर आहे. प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत त्याची सुरुवात आपल्या कुटुंबापासून नियमावलीची अंमलबजावणी केली पाहिजे असे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी केले.लायनेस  क्लब रत्नागिरी आणि रत्नागिरी वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा सोमवार दिनांक १५ मार्च रोजी रत्नागिरी येथील पोलीस मुख्यालय हॉल मध्ये पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, वाहतूक पोलीस निरीक्षक शिरीष सासने, लायनेस प्रेसिडेंट अॅड.कार्तिकी शिंदे, सेक्रेटरी शामल शेठ, लायनेस सायुजा प्रभावळकर आदी उपस्थित होते.
कोणत्याही चांगल्या गोष्टींची सुरुवात करताना दुसरा कोणी करेल यापेक्षा आपल्या कुटुंबापासून केले पाहिजे, प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी नीट केल्यास अपघाताला आळा घालता येईल असे अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी सांगितले.तर रस्ता अपघातात मृत्यू पावणाऱ्या एकूण संख्येत १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींचे ७० टक्के प्रमाण असल्याची धक्कादायक माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक शिरीष सासने यांनी दिली.  हेल्मेट नको म्हणत असताना ज्या वाहनचालकाचा जीव हेल्मेट नसल्याने गेला आहे त्या कुटुंबातील व्यक्तींचे दुःख पहा, अपघातात घरातील एक व्यक्ती मृत्यूमुखी पडली तरी संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते.  हेल्मेटमुळे अनेकांचे प्राण वाचले असल्याचे तसेच वाहतुकीचे नियम हे आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठीच असल्याचेही सासने यांनी सांगितले.
वाहतूक नियमावली साठी समाजातील विविध घटकातील प्रातिनिधिक प्रतिक्रिया कळाव्यात म्हणून वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने ही निबंध स्पर्धा घेण्यात आल्याचे लायनेस प्रेसिडेंट कार्तिकी शिंदे यांनी सांगितले.या कार्यक्रमावेळी निबंध स्पर्धेचा निकाल जाहिर करुन विजयी स्पर्धकांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक मुकुंद दत्तात्रय शेवडे, द्वितीय क्रमांक प्रतीक्षा हरिश्चंद्र आगरे, तृतीय क्रमांक विभागून ममता आत्माराम जाधव व मनोहर विष्णू सामंत तर उत्तेजनार्थ म्हणून कल्पेश आत्माराम पारधी यांचा समावेश आहे. या विजेत्यांना रोख पारितोषिक आणि सन्मानपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. तर यावेळी प्रथम क्रमांक विजेता मुकुंद शेवडे यांनी आपली वाहतूक नियमावलीबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. निवेदन जान्हवी पाटील यांनी केले तर आभारप्रदर्शन शामल शेठ यांनी केले.


........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121



Comments