दसरा-दिवाळीमुळे बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी वर्दळ

 


जिल्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करू लागला असल्याने ग्राहकांमधील भीतीही बऱ्यापैकी कमी झाली आहे. दसरा, दीपावलीचा सण तोंडावर असून, तुलसी विवाहानंतर लग्नसराई सुरू होणार आहे. त्यामुळे ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडू लागले आहेत. परिणामी बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ वाढू लागली आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून बाजारपेठेला चांगलाच फटका बसला होता. एप्रिल, मे महिन्यात लग्नसराईमुळे वर्षभराच्या ६० टक्के व्यवसाय होतो. मात्र, लॉकडाऊनमुळे कोट्यवधीचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. गणेशोत्सवातही बाजारपेठ शांत होती. त्यामुळे यावर्षी मान्सून सेलऎवजी व्यापाऱ्यांनी आता सेल लावले असून, २५ ते ३० टक्के विक्रीत सवलत देण्यात येत आहे.

तुलसी विवाहानंतर लग्नसराईला प्रारंभ होणार असल्याने ग्राहकांनी खरेदी सुरू केली आहे. लॉकडाऊनपासून ठप्प असलेले बाजारापेठेतील व्यवहार आता पूर्वपदावर येऊ लागले आहेत.

Comments