एका रात्रीत अर्धी मुंबई रिकामी करायची ताकद” वाहनांची प्रचंड गर्दी; मुंबई-गोवा हायवेवर लोक रस्त्यावर उतरले







अवघ्या एका दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुसळधार पाऊस आणि खड्ड्यांचा सामना करत मुंबईकर कोकणात दाखल व्हायला सुरवात झाली आहे. पण, त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहानांची प्रचंड मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गणपती बाप्पाच्या स्वागताची सर्वत्र जय्यत तयारी चालू असून मुंबई, पुण्यामध्ये राहणाऱ्या चाकरमान्यांचीही गावी जाण्याची गडबड सुरू आहे. नोकरी, तसेच व्यवसायानिमित्त मुंबईत राहणाऱ्या कोकणातील चाकरमानी गावाकडे निघाल्याने बसस्थानके, रेल्वेस्टेशन गर्दीने फुलून गेले असून दोन दिवसांपासून मुंबई- गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. याच गर्दीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीचा मुहूर्त गाठत गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी म्हणून मोठ्या संख्येनं चाकरमानी कोकणाच्या दिशेनं रवाना झाले आहे. मुंबई गोवा महामार्गासमवेत पर्यायी रस्त्यांवरही सध्या मोठ्या संख्येनं वाहनांची वर्दळ सुरू असून, त्यामुळं कोकणच्या दिशेनं जाणाऱ्या सर्व वाटांवर कमालीची गर्दी पाहायला मिळत आहे. मंगळवारपासूनच कोकणाच्या दिशेनं जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आणि गुरुवारी रात्रीपासून हा ओघ आणखी वाढला. या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचेही हाल होत असून ट्रॅफिक सुरळित करताना पोलिसांनाही मोठी कसरत करावी लागत आहे.

Comments