आंग्रे पोर्ट परिसरात कोळशामुळे प्रदूषण, कंपनीवर कारवाई करण्याची मागणी

रत्नागिरी : तालुक्यातील जयगड परिसरात आलेल्या अग्रे पोर्ट परिसरात उतरवण्यात येणाऱ्या कोळशामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून परिसरातील विहिरी प्रदूषित झाल्या आहेत. जनतेला वेठिस धरणाऱ्या या कंपनीविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय नागरी व पर्यावरण राष्ट्रीय संस्थेचे नंदू केदारी यांनी केली आहे.
जयगड येथील चाफेरी परिसरानजीक आंग्रे पोर्ट आहे. या बंदरावर कोळसा उतरवण्याचे काम सुरू आहे. याठिकाणी कोळसा उतरवण्यासाठी आवश्यक परवानगी कंपनीने घेतली आहे का? हे अद्याप स्पष्ट नाही. याशिवाय कोळसा साठा करून ठेवण्यासाठी बंदरावर वेगळी व्यवस्था नाही. वाऱ्यासोबत कोळसा पावडर परिसरातील घरांमध्ये, विहीरींमध्ये आणि खाडी व समुद्रात जाऊन प्रदूषण होण्याचा मोठा धोका आहे अशी तक्रार केदारी यांनी केली आहे.
याशिवाय हा कोळसा व पावडर आंबा कलमांवर पडत असून झाडे मृत होण्याची भीती आहे आणि हवेतून कोळसा पावडर श्वसनाद्वारे शरीरात जाऊन श्वसनाचे विकार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तरी संभावित धोका लक्षात घेता आपण उचित कारवाई करून येथील ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी केदारी यांनी केली आहे.
Comments
Post a Comment