परशुराम ते कापसाळ दरम्यानची अतिक्रमणे आजपासून हटविणार
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत कामाची गती वाढविण्यासाठी सोमवारी (दि.१४) परशुराम घाट ते कापसाळ दरम्यानच्या महामार्गावरील दोन्ही बाजूची अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत.
गेली अनेक वर्षे चिपळुणातील सुमारे ३५ कि.मी. अंतराच्या मार्गावरील चौपदरीकरणाचे काम धीम्या गतीने सुरू आहे. परशुराम घाट ते आरवली दरम्यान अनेक कारणांनी वाद उद्भवून चौपदरीकरणाचे काम वारंवार ठप्प होत आहे. प्रामुख्याने परशुराम घाट परिसरात जागेसंदर्भातील वाद, नैसर्गिक आपत्ती, वाहनांची वर्दळ आदी कारणांनी तर शहरात वाहनांची वर्दळ, जागेचा वाद, कामाच्या दर्जाबाबत तक्रारी तसेच कामाच्या तांत्रिक नियोजनाबाबत शहरातील नागरिक व महामार्ग विभाग अधिकारी यांच्यातील मतभेद अशा विविध कारणांनी चौपदरीकरणाची कामे रखडून गती मंदावली आहे. त्याचबरोबर काम करणाऱ्या ठेकेदार कंपन्या देखील बदलत आहेत. आता मात्र मे अखेर संपूर्ण चौपदरीकरणाचे काम पूर्ण व्हावे, या उद्देशाने परशुराम घाट ते कापसाळ दरम्यानचा सुमारे दहा कि.मी. मार्गावरील महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेली अतिक्रमणे हटविण्याचे काम सोमवारपासून संबंधित ठेकेदार कंपनीच्या माध्यमातून प्रशासनाच्या सहकार्याने केले जाणार आहे.
महामार्गालगत संपादीत केलेल्या जागेवर असलेली अतिक्रमणे काढून टाकण्याबाबत महसूल विभाग, पोलिस, राष्ट्रीय महामार्ग विभाग व संबंधित ठेकेदार यांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
Comments
Post a Comment