बिबट्याच्या संचारामुळे पाली बाजारपेठेत घबराट

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांत पाली परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याने सर्वत्र घबराट पसरलेली आहे.
पाली बाजारपेठेत कुत्री आणि शेळ्यांच्या मागावर असलेल्या बिबट्याने काही कुत्र्यांवर हल्ला केला आणि त्याच दरम्यान माणसांची चाहूल लागल्याने त्याने झेप घेत पाली पोस्ट ऑफीसनजीक मुंबई-गोवा रस्ता ओलांडून तो पलीकडील जंगलात भागात पसार झाला.
गेल्या आठवड्यात याच परिसरातील पाच कुत्रे बिबट्याने मारले. बिबट्या पाली बाजारपेठेतील मुख्य नागरी वस्तीत रात्रीच्या वेळीस सातत्याने येत आहे. हा बिबट्याचा वावर होत असलेला परिसर मुख्य नागरी वस्तीचा भाग असल्याने या परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. येथून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर वळके-बांबर या गावांचा जंगलमय परिसर असून तेथे मागील काही वर्षांमध्ये मोठी जंगलतोड झाल्याने वन्यप्राणी मानवी वस्तीकडे सहजरीत्या येत असावेत, असा अंदाज आहे. पाली बाजारपेठ सुतारवाडी आणि परिसरात फिरणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे.
Comments
Post a Comment