जपानी मियावाकी तंत्राचा रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला प्रस्ताव खानूतून सादर
रत्नागिरी : वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी प्रभावी ठरलेल्या जपानी मियावाकी तंत्राचा जिल्ह्यातील पहिला प्रस्ताव बनवण्यात आला असून नाणिज-खानू देवराईजवळ सुमारे १० गुंठे जागेवर देशी-विदेशी नाही तर स्थानिक प्रजातीची झाडे लावण्यात येणार आहेत. १६ लाखाचा हा प्रस्ताव असून सामाजिक वनीकरण विभागाने तो मंजुरीसाठी प्रशासनाला सादर केला आहे. कमी जागेत उभारणार घनदाट जंगल ऊभारण्याची ही पद्धत आहे. ही झाडे एकमेकांशी स्पर्धा करत नसल्याने तेथे दाट झाडी तयार होते.
राज्यात मुंबईसह जालना, औरंगाबाद, पुणे, जळगाव, नांदेड जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर जपानी मियाबाकी तंत्रज्ञानाचा वापर करून घनदाट वृक्ष लागवड करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून सागरी भागात असलेली खारफुटीची जंगले नष्ट होऊ लागली असून, तेथे सिमेंट काँक्रिटचे बांधकाम होऊ लागले आहे. काही ठिकाणच्या भागात असलेला हरितपट्टाही अतिक्रमणामुळे नष्ट होऊ लागला आहे. यावर मात करण्यासाठी आता प्रशासनाने जपानी पद्धतीचे "मियावाकी' तंत्रज्ञान वापरून वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. या मियावाकी पद्धतीमध्ये अगदी कमी जागेत अधिक झाडांची लागवड केली जाते. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत ही वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. सामाजिक वनिकरण विभागाने जिल्ह्यातील जपानी मियावाका तंत्रज्ञानाचा पहिला प्रस्ताव तयार केला आहे. खानू येथील वनराईच्या जवळपास ही जागा आहे. यामध्ये विविध प्रजातीच्या झाडांचा समावेश आहे. वाढीसाठी लागणाऱ्या ऊन, पाण्यासाठी ती झाडे एकमेकांशी स्पर्धा करणार नाही. त्यामुळे सर्वच झाडांची चांगली वाढ होऊन घनदाट जंगल तयार होते.
मुंबई महापालिका विविध सामाजिक सेवाभावी संस्थांच्या मदतीने मुंबई शहर आणि उपनगरात मियावाकी पद्धतीचे जंगल उभे करत आहे.
Comments
Post a Comment