आ. भास्कर जाधवांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करा; रत्नागिरी भाजपच्या कार्यकर्त्यांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

 

रत्नागिरी : 'आमचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आ. नितेश राणे यांच्या बद्दल एकेरी भाषा वापरत बदनामी वक्तव्य करून दोन राजकीय पक्षांमध्ये संघर्ष व्हावा आणि समाजात तेढ निर्माण व्हावी यासाठी प्रवृत्त करणाऱ्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्याविरुद्ध तत्काळ कायदेशीर करावी', अशी मागणी भाजपच्या रत्नागिरी कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ मोहित कुमार गर्ग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

हे निवेदन डॉ. गर्ग यांच्यासह रत्नागिरी ग्रामीण च्या पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मध्ये शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या भाषणामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याबद्दल शिवराळ आणि बदनामीकारक भाषा वापरली. यामुळे दोन राजकीय पक्षांमध्ये तेढ निर्माण होण्यास भास्कर जाधव यांनी प्रवृत्त केले असून भास्कर जाधव यांच्यामुळे दोन गटांमध्ये दोन पक्षांमध्ये तेढ निर्माण होऊन संघर्ष होईल अशी स्थिती आता निर्माण झाली आहे. त्यांच्या या कृत्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना चिथावणी प्राप्त झाली असून त्यातून दंगे घडून येण्याची शक्यता सुद्धा निर्माण झाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे हे आमच्यासाठी वंदनीय नेते असून आ. जाधव यांच्या या निदनीय कृत्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत.

त्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण करून सामाजिक अशांतता निर्माण करणाऱ्या गुहागरचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या या कृत्याची दखल घेऊन त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. यावेळी भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर चव्हाण, प्रवक्ते नित्यानंद दळवी, अशोक वाडेकर, धनंजय पाथरे, संकेत कदम, यातील शिवलकर, अक्षय चाळके, पिंट्या देसाई, श्रीनाथ सावंत, अक्षय पवार आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments