कचरामुक्तीसाठी रत्नागिरीत बसवणार सीसीटीव्ही कॅमेरे

रत्नागिरी : रत्नागिरी शहर कचरामुक्त ठेवण्यासाठी ठिकठिकाणा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून आवश्यक तर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईही केली जाणार आहे.
सध्या रत्नागिरी शहरात रस्त्याच्या शेजारी गुपचूप कचरा टाकणार्यांची संख्या वाढत आहे. विशेषतः शहरालगत हे प्रमाण वाढलेले आहे. यामुळे आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा कचरा टाकणार्यावर कारवाई करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. याची सुरुवात विमानतळाकडे जाणार्या रस्त्यापासून होणार आहे. तेथे पोलीस प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार असून संबंधितावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकुमार पुजार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत याबाबतची चर्चा झाली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई यांच्यासह नगरपालिका, शिरगाव व मिरजोळे ग्रामपंचायत, कोस्टगार्ड, पोतीस, प्रदूषण नियंत्रण विभाग, एमआयडीसी, स्वच्छता विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळ वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर रत्नागिरीतील विमानतळावरून वाहतूक सुरू करण्यासाठी जिल्हास्तरावर बैठकाही सुरू आहेत. मात्र विमानतळाकडे जाणारा रस्त्यावर पाच ठिकाणी कचरा टाकून ठेवला जातो. त्यात प्लास्टिक कचर्यासह हॉटेल, दुकानदारांकडील कचऱ्याचा समावेश असतो. त्यामुळे तेथे पक्षी, प्राण्यांचे वास्तव्य असते. यावर उपाय म्हणून प्रशासनाने कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाईचा निर्णय घेतला आहे.
नगरपालिका आणि ग्रामपंचायतींद्वारे परिसरातील दुकानदार, मटण विकणारे, टपरीवाले, भाजी व्यावसायिक यांच्यासह नागरिकांना सूचना दिल्या जाणार आहेत. कचरा टाकण्यात येणार्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील. कचरा रात्री टाकला जात असल्याने ग्रामपंचायत व पोलीस यांची गस्त घालण्यात येणार आहे. कचर्यामुळे भविष्यात कोणत्याही समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी या उपाययोजना केल्या जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Comments
Post a Comment