रत्नागिरी शहरातील किल्ला दसपटवाडी भागातील निकृष्ट दर्जाच्या नळपाणी योजनेच्या कामाबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष निलेश भोसले यांचे रत्नागिरी नगर परिषद मुख्याधिका-यांना पत्र

रत्नागिरी नगर परिषदेच्या वतीने रत्नागिरी शहरातील किल्ला दसपटवाडी या भागात निकृष्ट दर्जाचे नळपाणी योजनेचे काम सुरु असल्याकारणाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे रत्नागिरी शहराध्यक्ष निलेश भोसले यांनी रत्नागिरी नगर परिषदेला पत्र लिहून आंदोलनाचा ईशारा दिला आहे.
रत्नागिरी शहरातील किल्ला दसपटवाडी भागात पाणीपुरवठा करण्याकरिता डोंगरामधून पाईपलाईन टाकण्यात आली आहे. त्याची पाहणी करता ते काम योग्य झालेले नाही तसेच नियमाला धरुन झालेले नाही. हा भाग डोंगराळ असल्याने इथे वणवे लागतात. पावसाळ्यात देखील पाणी रस्त्यावरुन वाहत असते. त्यामुळे टाकण्यात आलेल्या पाईपलाईनचे नुकसान होऊन या भागातील नागरिकाना पाण्यापासून वंचित रहावे लागू शकते. तरी हे काम प्रशासनाकडून व्यवस्थित पाहणी करुन घेऊन योग्य पद्धतीने करुन घ्यावे नपेक्षा या भागातील नागरिक सनदशीर मार्गाने आंदोलन करुन शासनाकडे दाद मागतील अशा आशयाचे पत्र राष्ट्रवादी शहराध्यक्ष निलेश भोसले यांनी रत्नागिरी नगर परिषदेच्या मुख्याधिका-यांना लिहिले आहे.

Comments