रत्नागिरी जिल्ह्यातील ४ नगर परिषदा आणि २ नगरपंचायती यांच्याकडून पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन : प्रतिदिन प्रक्रीया न करता समुद्र आणि नद्यांमध्ये सोडले जाते २ कोटी ३९ लाख लिटर सांडपाणी, ‘सुराज्य अभियान’ उपक्रमाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीची कठोर कारवाईची मागणी

रत्नागिरी -रत्नागिरी जिल्ह्यातील ४ नगरपरिषदा आणि २ नगरपंचायत यांच्याकडून दर दिवशी एकूण २ कोटी ३९ लाख लिटर प्रदूषित सांडपाणी त्यावर कोणतीही प्रक्रिया न करता तसेच समुद्र आणि नद्यांमध्ये सोडले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे माहितीच्या अधिकाराखाली श्री. संजय जोशी आणि श्री. सुरेश शिंदे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषदांकडून सोडण्यात येणार्‍या सांडपाणी प्रक्रीयेविषयी माहिती मागवली असता ही धक्कादायक बाब उघड झाली. प्रदूषित सांडपाणी प्रक्रीया न करता तसेच सोडल्याने नागरिकांच्या आरोग्याला पर्यायाने जीवाला धोका निर्माण झाल्याने हिंदु जनजागृती समितीने याबाबत कठोर कारवाईची मागणी केली आहे. याबाबत हिंदु जनजागृती समितीचे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील सुराज्य अभियान उपक्रम समन्वयक श्री. संजय जोशी यांनी आज रत्नागिरी येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.
    श्री. जोशी म्हणाले की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी, राजापूर, चिपळूण आणि खेड या नगरपरिषदांकडून दर दिवशी अनुक्रमे ८८ लाख, २० लाख, ७० लाख आणि २५ लाख लिटर सांडपाणी त्यावर कोणतीही प्रक्रिया न करता समुद्रात आणि नदीत सोडले जाते; तर दापोली आणि गुहागर नगरपंचायतींकडून दर दिवशी अनुक्रमे ३० लाख आणि ६ लाख लिटर पाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीत सोडले जाते. या प्रकरणी केवळ नोटीस पाठवण्या व्यतिरिक्त संबंधितांवर कारवाई करण्याबाबत प्रदूषण मंडळाकडून होत असलेली दिरंगाई प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
      प्रदूषित सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट समुद्रात सोडल्याने समुद्रातील जीवसृष्टीवर त्याचा परिणाम होतो. प्रदूषित पाण्याने मासे मृत झाल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश जनता मत्स्याहारी असल्याने प्रदूषित पाणी प्रक्रिया न करता थेट समुद्र आणि नदी यांत सोडल्याने नागरिकांच्या आरोग्याला पर्यायाने जीवाला धोका निर्माण झाला आहे. हे मासे बाहेरील शहरांतही पाठवले जात असल्याने या धोक्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. अलिकडेच कोरोना, ओमिक्रॉन सारख्या संसर्गजन्य महामारीने आख्खे जग ग्रासलेले असतांना अशा प्रकारचा निष्काळजीपणा नागरिकांच्या जीवाचा धोका वाढवत आहे. या प्रकरणी आम्ही हिंदु विधिज्ञ परिषदेच्या अधिवक्त्यांचा सल्ला घेतला. त्यामुळे नगरपरिषदा आणि पालिका यांच्यावरच नव्हे; तर प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावरही विभागीय चौकशीसह फौजदारी कारवाई होऊ शकते, असा सल्ला त्यांनी आम्हाला दिला.

नगरपरिषदा, पालिका यांच्या बरोबर प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी यांच्यावर कारवाई होणे गरजेचे- अधिवक्ता सौ. अस्मिता सोवनी, हिंदु विधिज्ञ परिषद
   प्रदूषण करणे हा गुन्हा असून त्यावर कारवाई न करणे हे गुन्ह्याला पाठीशी घालणे आहे. प्रदुषण ही विषारी समस्या असून शहरीकरणाकडे चाललेल्या कोकणामध्ये आताच या समस्येवर कारवाई केली नाही तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.  त्यामुळे प्रदुषण थांबवण्यासाठी संबंधितांनी त्वरीत कारवाई करावी, असे आवाहन आज अधिवक्ता सौ. अस्मिता सोवनी यांनी केले. तसेच कारवाई न झाल्यास पुढच्या कारवाईचे दरवाजे उघडे आहेत, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सदर पत्रकार परिषदेला श्री संजय जोशी, सुराज्य अभियान समन्वयक, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, श्री. संदेश गावडे, हिंदु जनजागृती समिती, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक, अधिवक्ता सौ. अस्मिता सोवनी, हिंदु विधिज्ञ परिषद, श्री. विनोद गादीकर, हिंदु जनजागृती समिती, रत्नागिरी जिल्हा समन्वयक आदी उपस्थित होते.

Comments