ओमिक्रॉनचा धोका; राज्यात जमावबंदी लागू; वाचा नवी नियमावली

मुंबईः 
राज्यात ओमिक्रॉन रुग्णांची वाढती संख्या व नाताळ व न्यू इअरच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवे निर्बंध लागू केले आहेत. राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत राज्यात जमावबंदीची घोषणा करण्यात आली आहे. तसंच, सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध लावण्यात आले आहेत.

ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे. जगातील ११० देशांमध्ये ओमिक्रॉनचा प्रसार झाला आहे. या विषाणुच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध लावावेत व पुढील काळात याचा प्रसार बघून अधिक निर्बंध लावण्याबाबत विचार व्हावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं आहे.

राज्यात देखील गेल्या दोन दिवसात एक हजारापेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण दिसून येत आहेत. ख्रिसमस उत्सव, लग्न समारंभ, नवीन वर्षाचे स्वागत यामुळे गर्दी वाढून संसर्गाचा धोका वाढण्याची मोठी शक्यता असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ प्रमाणे संपूर्ण राज्यात काही अतिरिक्त निर्बंध लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आज राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी आदेश काढले आहेत.

संपूर्ण राज्यात सर्व सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा अधिक व्यक्तींच्या एकत्रित येण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत बंदी असेल. तसंच, लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १००च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५०च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल, असे आदेश राज्य सरकारने काढले आहेत.
उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच ५० टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल. याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी त्यानी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील, असंही या आदेशात नमूद केलं आहे

Comments