नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंना पत्र; म्हणाले “वस्तुस्थिती आपणापासून लपवली गेली असेल!


भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहिलं अआहे. करोना काळात अनेकांनी आपले प्रियजन गमावले. या कठीण काळात महाविकास आघाडी सरकारने व मुंबई महानगर पालिकेत असलेल्या सत्ताधारी सेनेने आपल्या नियोजनाचा अभाव आणि अनाठायी निर्बंधातून सामान्य जनतेला मेटाकुटीला आणलं अशा शब्दांत त्यांनी टीका करत नाराजी जाहीर केली आहे.
“आपल्या नाकर्तेपणाचं सगळं पाप झाकण्यासाठी सगळं खापरं करोनावर फोडायचं आणि पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचं श्रेय महापालिकेनं मिरवायचं असं स्वार्थी धोरण सत्ताधारी सेना राबवत आहे, हे अत्यंत निंदनिय आहे,” अशी टीका नितेश राणे यांनी पत्रातून केली आहे. “दवाखान्यात लागणाऱ्या आगी, ऑक्सिजन अभावी तडफडून मेलेली जनता, ऑक्सिजन गळती यामुळे आरोग्य सेवेचे पुरते धिंडवडे निघाले. परंतु अशाही प्राप्त परिस्थितीत पहिल्या फळीतील कर्मचारी, कोविड योद्ध्यांनी आपल्या कुटुंबाचा विचार न करता सामान्य नागरिकांची अहोरात्र सेवा केली. त्यांच्या नशिबी मात्र आघाडी सरकारने फक्त फरफट आणून ठेवली,” असं नितेश राणे म्हणाले आहेत.  “आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पगारी वेळवर नाही म्हणून त्यांना आंदोलनं करावी लागली. सरकार साधं विम्याचं कवचही कर्मचाऱ्यांना व फ्रंटलाईन वर्कर्सना देऊ शकलं नाही. जे कर्मचारी कर्तव्यावर असताना मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीच्या फक्त घोषणाच झाल्या. ज्या फ्रंटलाईन वर्कर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचं भांडवलं करत राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला, त्याच फ्रंटलाईन वर्कर्सच्या दुसऱ्या लसीकरणाचा टप्पा सत्ताधारी सेनेला पुर्ण करता आलेला नाही,” असंही त्यांनी म्हटलं आहे.

Comments