शब्द लहरी

 

      

 शब्द लहरी 

-------------------------

 मित्र मैत्रिणी 

          काही दिवसांपूर्वी विचार करत होतो, आपण किती भाग्यवान आहोत ना की मला या आजच्या कलियुगात जिथे विश्वासच विश्वासाचा घात करतो आणि जिथे माणूस माणसाचा घात करतो त्या जगात आज मी माझ्या धीराला धीर देणाऱ्या मित्र मैत्रीणींसमवेत माझे आयुष्य वेचत आहे. खरच मित्र मित्राचा सोबती म्हणतात ना ते उगीच नाही. असतात काही मित्र मैत्रीणी की जे प्रत्येक ठिकाणी स्वतःच्या स्वार्थाचा आणि फायद्याचा विचार करतात. जिथे आपला फायदा असेल त्या ठिकाणी धूम ठोकणारे मित्र अनेक असतात हो पण याला मैत्री म्हणायची का हा प्रश्न कायम हृदयाच्या कोपऱ्यात ठोठावतो. इतरांचे मी बघतो तेव्हा मला नेहमी हाच प्रश्न मनात कायम सतावत असतो. पण माझे तसे नाही.
मला ही आहेत बरेच मित्र मैत्रिणी, what's app वर जर contact list check केल्यास मित्र मैत्रिणींच्या contact नंबरची भली मोठी रांग दिसेल, पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर मला असे खूप थोडे मित्र मैत्रीणी आहेत की जे आधार देतात, वेळेला मदतीसाठी धावून येतात, मला असे वाटते आज मी इथपर्यंत जो काही पोहोचलो किंवा आज मी जो काही आहे त्यात माझ्या आई वडिलांबरोबरच मित्र मैत्रिणींचे सुद्धा श्रेय अधिक आहे.
          पण माझे हे अहोभाग्य आहे की जे पण माझे जीवाला जीव देणारे मित्र मैत्रिणी आहेत त्यांच्यापासून मला आज पर्यंत बरेच काही शिकण्यास मिळाले आणि अजूनही मिळत आहे. माझ्या मतानुसार जे मित्र मैत्रिणी वेळेवर मदतीला धावून येतात किंवा ज्यांच्या मनात आपल्याविषयी प्रेम, आदर, आपुलकी आहे, ज्यांना आपल्यासाठी काही करावेसे वाटते ते खरे मित्र. 
आणि असेच मित्र आज मला लाभले ही माझ्यावरील ईश्वर कृपाच आहे. माझ्या मित्र मैत्रिणींबद्दल अधिक सांगायचे झाले तर, का कुणास ठाऊक पण माझ्या बाबतीत एक तत्व ठरलेले दिसून येते की, असे मी वैयक्तिकरीत्या मानतो, ते कितपत खरे ते मला माहित नाही. परंतु, असे काही प्रसंग आहेत आणि काही घटना आहेत ज्याने या सगळ्याची जाणीव होते ते म्हणजे.......
          आता बघा, मी इयत्ता पहिलीपासून पाचवीपर्यंत प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होतो तेव्हा आमचा इयत्ता दुसरीपासून चार जणांचा ग्रुप बनला होता. पुढे मी माध्यमिक शाळेत प्रवेश घेतला तेव्हा माझे नशीब इतके चांगले की माध्यमिक शाळेतील ग्रुपमधील माझा रोहित घोडके नावाचा मित्र माझ्याच वर्गात भेटला आणि आमची मैत्री आणखी फुलत गेली. माध्यमिक शाळेतही आमचा तीन मित्रांचा ग्रूप होता जो आजही आहे आणि आजही आम्ही संपर्कात आहोत त्यानंतर मी पुढे ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तेव्हाही आमच्या माध्यमिक शाळेतील माझे दोन मित्र म्हणजे तो रोहित घोडके आणि शुभम मकवान हे दोघे तिथेच भेटले त्या दोघांना माझ्याच कॉलेजमध्ये पाहून माझा आनंद गगनात मावेनासा झाला. असे रोहित आणि मी बारावी पर्यंत एका वर्गात होतो त्यानंतर मी BCA साठी  सिनियर कॉलेजला प्रवेश घेतला होता तिथे मी एक वर्ष होतो अर्थात मला ते जमत नव्हते म्हणून मी सोडून दिले ती वेगळी गोष्ट आहे पण तिथे माझी ज्या मित्र मैत्रिणींशी ओळख झाली होती ते मित्र आजही टिकून आहेत आणि खूप मदत करतात बऱ्याच वेळेला आमचा चार जणांचा ग्रुप फिरायला ही जाऊन आलो आहे खूप धमाल केली आजपर्यंत. पुढे मी परत बीकॉम साठी प्रवेश घेतला तिथेही माझा आठ जणांचा ग्रुप झाला त्या ग्रुप मधील मित्र आणि मैत्रीणी आजही चांगलेच संपर्कात आहेत. त्यातील अत्यंत जवळचा माझा एक मित्र आकाश यादव नावाचा खुप innocent आणि अतिशय प्रामाणिक मला बऱ्याच वेळेला त्याने मला मदत केली. एके दिवशी कॉलेजमध्ये असताना पाऊस चालू असल्यामुळे माझी गाडी बंद पडली होती चालू होत नव्हती आणि आजूबाजूला कोणते गॅरेज ही नव्हते तेव्हा त्याने मला खूप मदत केली तो माझ्यासोबत होता म्हणून मी वेळेत घरी पोहोचू शकलो. नाही तर माहित नाही काय झाले असते. 
          एकदा माझ्या BCA च्या कॉलेजमधील आकाश भराडे नावाच्या मित्राला भेटायला गेलो असता घरी परतण्यासाठी गाडीत पेट्रोल नव्हते आणि पेट्रोल भरायला माझ्याकडे एक रुपयाही नव्हता त्या दिवशी त्याने मला चक्क 500 रुपयांची मदत केली ज्या अर्थी 50 रुपयांच्या पेट्रोलसाठी त्याने मला 500 रुपये देऊ केले तर दिलदार स्वभावच म्हणावा. 
एके दिवशी मार्केटमध्ये mobile accessories घेण्याकरिता BCA च्या कॉलेजमधील मित्रासोबत गेलो असता त्या मार्केटमध्ये गाडी नो पार्किंगमध्ये पार्क केल्यामुळे माझी गाडी उचलून नेली तर तेव्हा सुध्दा माझ्या खिशात 100 रुपये होते आणि गाडी सोडवण्यासाठी पोलिसांनी 500 रुपयांची पावती फाडण्यास सांगितली तेव्हा सुद्धा त्या मित्राने तिथे पैसे भरून माझी गाडी सोडवली हे खूप मोठे सहकार्य होते माझ्यासाठी. 
         माझ्या घराजवळील मित्र सुद्धा असेच मित्रासाठी जीव ओवाळून टाकणारे. बऱ्याच वेळेला मदतीसाठी जिथे कुठे असेल अथवा चार कोस दूर असेल तरी धावून येणारे आहेत. तसेच आर्थिक मदत लागली तरी मागे पुढे न पाहता याउलट घरच्यांचा विरोध पत्करून मदतीसाठी मध्य रात्रीही धावून येणारे मला लाभले याचा मला खूप आनंद आहे. याशिवाय कधी फोनवर सुद्धा पहिला प्रयत्न असतो भाऊ तू कसा आहेस आई वडील कसे आहेत या वाक्याने आमची बोलण्याची सुरुवात होते. हे ही खूप झाले.
          आज माझ्याकडे बोटावर मोज्याइतके जरी म्हटले तरी friend circle माझे आज बरेच मोठे आहे हे खूप विशेष. शिवाय या friend's circle मधील सर्वच चांगले, सुसंस्कृत, चारित्र्यसंपन्न अशा माझे सख्खे भाऊ नसले तरी भावासारखा जीव लावणाऱ्या मित्रांसाठी मी आज भरून पावलो. माझ्या या आजच्या प्रगतीमध्ये त्यांचाही खूप मोलाचा वाटा आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. या माझ्या भावांनी आजवर खूप केले माझ्यासाठी मी कधी यांच्यासाठी काही करेन याची त्या संधीची मी आतुरतेने वाट बघतो आहे. कधी येतील ते क्षण आणि कधी देईल मी त्या क्षणांना उजाळा! देव करो आणि मला त्यांच्यासाठी, खास माझ्या जीवाभावाच्या मित्रांसाठी काहीतरी करण्याची संधी मिळो. 
त्यांचे वागणे, बोलणे, किती काळजाला भिडतात शब्दात नाही व्यक्त करू शकत. पण या सर्व माझ्या मित्रांचे चांगल्या रीतीने ऋण फेडण्यासाठी नक्कीच माझा प्रयत्न असेल. माझे मित्र म्हणजे दुधावरची साय, वासराची गाय कितीही म्हटले तरी सुद्धा त्यांची माझ्यावर असलेली माया कधी आटणार नाही ही खात्री आहे. आजच्या माझ्या यशविस्तेचे सर्व श्रेय या माझ्या मित्रांना आहे. त्यांच्यामुळे मी आहे असे दिलदार स्वभावाचे, मित्र मिळायला भाग्य लागते ते भाग्य आज माझ्या नशिबी आले तर त्यातच सर्व काही आले. 
भावासारखे मित्र आज 
आलेत माझ्या जीवनी 
त्यांच्यासाठी कायम 
राहील शतश: ऋणी
आज मी या लेखनाद्वारे माझ्या सर्व मित्रांना आणि मैत्रिणींना इतकेच सांगू इच्छितो तुम्ही कधीही आवाज द्या हा तुमचा मित्र नयन धारणकर कायम जिथल्या तिथे तुमच्या नजरेसमोर मदतीसाठी हजर असेल. कारण तुमच्यासाठी काय पण यार तुमच्यासाठी काय पण........ 


लेखक/कवी : नयन धारणकर
-----------------------------------------     
         
 ज्ञानेश्वरीतील   सुंदर  प्रतिमाने


           अर्जुन   आता  आपल्या  शंका
श्री क्रुष्णाला   विचारतोय.

          देवा , तुवाची  ऐसें  बोलावे । तरी
आम्ही  नेणती  काय  करावे ? ।  आता
संपले  म्हण  पां  आघवे । विवेकाचे  ।।

       वैद्यु  पथ्य  वारूनि  जाये ।  मग  जरी आपणाचि  विष  सुये ।  तरी  रोगिया
कैसेनि  जिये  ।  सांगै  मज  ।।

        जैसे  आंधळे  सुइजे  आव्हांटा  ।
का  माजवण  दीजे  मर्कटा ।  तैसा  उपदेशु  हा  गोमटा  । वोढवला  आम्हां ।।


        देवा ! तूच  जर  असे  संदेहकारक  
बोलू  लागलास  तर  आम्ही  अज्ञानांनी
काय  करावे ?  तर  आता  सर्व  विचार 
संपला   असेच  म्हणण्याची  पाळी  आली
आहे .

          अहो  ! वैद्य  हा  रोग्याची  प्रक्रुती
पाहून  प्रथम  त्यावर  पथ्याची  योजना  
( रोग्याने  काय  खावे ?काय  खावू  नये )
सांगून  गेल्यावर  मग  जर  वैद्य च  जर
त्या  औषधात  विष  घालील  तर  तो
रोगी  जगेल  तरी  कसा ? हे  सांग  बरे!


        जसे  आंधळ्यास  आडवाटेला  लावावे  किंवा  आधीच  माकड  आणि
त्यात   त्याला  मादक पदार्थ  पाजावेत
तसा  तुझा  हा  उत्तम  उपदेश  आम्हास
फार  चांगला  लाभला  म्हणायचा .


        सौ.  शैलजा  जाधव (पाटील)
           चांदवड   नासिक
-----------------------------------

   निसर्ग

 निसर्ग हा फक्त मनुष्याचाच मित्र नसून तो पशू व पक्ष्यांचाही घनिष्ट मित्र आहे. कारण तो मनुष्या सोबत पशू पक्ष्यांची देखील अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची व्यवस्था करीत असतो.आपल्याला निसर्गाचे संतुलन न बिघडवता याचा योग्य उपयोग करवून घ्यायला हवा. निरोगी जीवनासाठी निसर्गाचा पूर्णपणे उपभोग घेणे अतिशय आवश्यक आहे. आपल्याला आपल्या निसर्गाकडे लक्ष्य द्यायला हवे याला स्वच्छ ठेवायला हवे. इकडे तिकडे कचरा न टाकता त्याला कचरा कुंडीत टाकून योग्य विल्हेवाट लावायला हवी. 

सौ.प्रतिमा अरुण काळे
निगडी प्राधिकरण पुणे,४४
-------------------------------------
शब्दगंध..

जय जवान जय किसान 
घोष मंत्र दिला आम्हास 
निष्ठा, इमानदारीने काम करून 
लाभले पंतप्रधान देशास

लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त..शतशः प्रणाम 

सौ मधुरा कर्वे.( भावगंधा )
पुणे.

Comments