मालगुंड येथे कोमसापच्या वतीने कवी केशवसुत जयंती साजरी




 मालगुंड येथे कोमसापच्या वतीने कवी केशवसुत जयंती साजरी

मालगुंड,रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंड, कवी केशवसुत स्मारक मालगुंड आणि कवी केशवसुत सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने व कोकण मराठी साहित्य परिषदेच्या युवाशक्तीच्या पुढाकाराने मराठी साहित्यातील समाजपरिवर्तक साहित्यिक कवी केशवसुत यांची शतकोत्तर पंचावन्नवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

 यावेळी सुरुवातीला कवी केशवसुत यांच्या पुतळ्याला कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालगुंड शाखेचे कार्यकारिणी सदस्य रामानंद लिमये यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे यांनी कवी केशवसुत यांनी कवितांमधून तत्कालीन समाज रुढीवर केलेले प्रहार या विषयांवर मार्गदर्शन करताना कवी केशवसुतांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून तत्कालीन रूढी, वाईट परंपरा, अनिष्ट चालीरिती, विघातक व्यवस्था यांच्यावर हल्ले करतानाच मानसिक गुलामगिरीत अडकलेल्या लोकांना सकारात्मकतेची नवी उमेद दिली. त्यामुळे समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय देण्यासाठी कवी केशवसुतांच्या कविता ह्या आजही दिशादर्शक असल्याचे मत व्यक्त केले.

 त्यांनतर गझलकार अमेय धोपटकर यांनी कवी केशवसुत यांच्या कवितांचा आढावा घेत त्यांच्या कवितांच्या मागील प्रेरणा व त्यातील अलंकारिकपणा मांडुन कवी केशवसुत यांच्या विविध कवितांचे महत्त्व सादर केले

 तसेच संचित जोशी यांच्यासह कवी केशवसुत यांच्या कविता चालीसह सादर करत कार्यक्रमाची उंची वाढविली. त्यासोबतच कोकण मराठी साहित्य परिषदेचे दक्षिण रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष तथा कवी अरुण मोर्ये यांनी जयंतीचे औचित्य साधून कवी केशवसुत यांच्या आणि विविध सामाजिक विषयांना स्पर्श करणाऱ्या स्वरचित कविता सादर केल्या.

 कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा कवी केशवसुत स्मारक मालगुंडचे अध्यक्ष गजानन पाटील यांनी जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देत कवी केशवसूत यांचे साहित्य आणि त्यांचे विचार कोकण मराठी साहित्य परीषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा विश्वस्त प्रमुख आदरणीय मधु मंगेश कर्णिक तथा मधुभाई यांनी कवी केशवसुत यांचे जन्मघर हे स्मारक म्हणून प्रसिद्ध केले आहे. आपण सर्वांनी हा वारसा जपत कवी केशवसुत यांचे विचार आज समाजासमोर येण्याची आवश्यकता आहे. कारण भविष्यातील तरुण पिढीला हे साहित्य प्रेरणा देण्याचे कार्य करील असा आशावाद व्यक्त केला.

 या कार्यक्रमाचे विषयानुरूप प्रास्ताविक कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंडच्या अध्यक्षा नलिनी खेर, सूत्रसंचालन कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंड अंतर्गत युवाशक्तीच्या प्रमुख स्मिता बापट तर उपस्थितांचे आभार कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंडच्या कार्याध्यक्षा शुभदा मुळ्ये यांनी केले.

 आजच्या कार्यक्रमाला कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंडचे खजिनदार विद्याधर तांदळे, रामानंद लिमये, दीपाली केळकर, अप्पा आग्रे, राजेश सनगरे, कमलाकर थुळ यांच्यासह विद्यार्थी, साहित्यरसिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.

 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमेय धोपटकर, अरुण मोर्ये, स्वप्नेश राजवाडकर, कुमार डांगे, यांच्यासह स्मारक व्यवस्थापन समितीचे कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या