पुनर्वापर केलेल्या खाद्यतेलाची विक्री



पुनर्वापर केलेल्या खाद्यतेलाची विक्री

वडापाव, चायनीज पदार्थ विक्रेत्यांकडून कमी दरात खरेदी; धारावीपाठोपाठ गोवा, गुजरातमध्ये कारवाई

 मुंबई : मुंबईत पुनर्वापर केलेल्या खाद्यतेलाची बेकायदा विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब भारतीय अन्न सरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) धारावीतील कारवाईतून उघडकीस आली. यानंतर एफएसएसआयने महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसह गोवा, गुजरात आणि मध्य प्रदेशातील ३४ ठिकाणी छापे टाकले. पुनर्वापर केलेल्या खाद्यतेलाची विल्हेवाट न लावता त्याची वडापाव, चायनीज विक्रेत्यांना विक्री करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.

तीन वेळा खाद्यतेलाचा वापर केल्यानंतर त्याचा पुन्हा वापर करणे योग्य नसते. त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असल्याने अशा खाद्यतेलाचा पुन्हा अन्नपदार्थासाठी वापर करण्यावर कायद्याने बंदी आहे. दिवसाला ५० लिटर खाद्यतेलाचा वापर करणाऱ्या अन्नपदार्थ विक्रेत्यांना त्याचा तीन वेळा वापर करणे बंधनकारक आहे. त्यानंतर नियमानुसार या खाद्यतेलाची विल्हेवाट लावण्यासाठी ते बायोगॅस वा साबण निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना देणे क्रमप्राप्त आहे. प्रतिदिन ५० लिटरपेक्षा कमी खाद्यतेलाचा वापर करणाऱ्या अन्नपदार्थ विक्रेत्यांनाही त्याचा तीनच वेळा वापरण्यास परवानगी आहे. मात्र अशा खाद्यतेलाचा पुनर्वापर करण्यास सक्त मनाई आहे. मात्र या नियमांचे पालन होत नसून पुनर्वापर केलेल्या खाद्यतेलाची विक्री केली जाते, असे खाद्यतेल वडापाव, चायनीज विक्रेत्यांना विकले जात असल्याची बाब धारावीतील एफएसएसएआयच्या कारवाईतून समोर आली. यानंतर एफएसएसएआयने महाराष्ट्रासह आता गोवा, गुजरात आणि मध्य प्रदेशातही कारवाई केली असून येथेही असे प्रकार सुरू असल्याचे समोर आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

या कारवाईनुसार २५हून अधिक अन्नप्रक्रिया उद्योग, चार खाद्यतेल संकलक, पाच बायोडिझेल उत्पादक, तसेच एका साबण निर्मात्याची अचानक तपासणी करण्यात आली. यावेळी विविध उत्पादकांच्या ताजे खाद्यतेल खरेदीत आणि यातून बाहेर पडणाऱ्या अपेक्षित अनुपयुक्त खाद्यतेलात प्रचंड तफावत आढळून आली आहे. खाद्य व्यावसायिक आणि अन्नप्रक्रिया उद्योगांद्वारे खाद्यतेलाच्या विल्हेवाटीसंबंधात अतिशय निष्काळजीपणा करीत असल्याचेही आढळून आले. पुनर्वापर केलेले खाद्यतेल बायोडिझेल/साबण उत्पादकांना न देता इतर संकलकांना म्हणजेच भंगारवाल्यांना देण्याकडे बहुतांशी अन्नप्रक्रिया उद्योगांचा कल असल्याचे आढळून आले. गोव्यात अनेक हॉटेल बायोडिझेल उत्पादकांना खाद्यतेल न देता खुल्या बाजारात हे खाद्यतेल विकत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही पंचतारांकित हॉटेलनी तर ताज्या खाद्यतेलाच्या तुलनेत अनुपयुक्त खाद्यतेलाचे प्रमाण अवघे दीड टक्के दाखवले आहे, हे संशयास्पद प्रमाण खाद्यतेलाचा मर्यादेहून अधिक वेळा वापर झाल्याकडे इशारा करत होते. जेणेकरून या हॉटेलविरोधात सुधारणा नोटीस जारी करण्यात आली आहे.

एफएसएसआयकडून छापासत्र

पुनर्वापर केलेले खाद्यतेल पुन्हा वापरात आणले जात असून ही धोक्याची, चिंतेची बाब असल्याचे म्हणत एफएसएसएआयने आता कारवाईला आणखी वेग देत छापासत्र सुरू केले असून याविरोधात कडक कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. यातून येत्या काळात अनेक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, रस्त्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळावे, असे आवाहन एफएसएसएआयकडून करण्यात आले आहे.


....................................

टिप्पण्या