राज्यातील शिक्षणोत्सव शाळेची आज पहिली घंटा!


राज्यातील शिक्षणोत्सव शाळेची आज पहिली घंटा!

शिक्षणोत्सव : मुख्यमंत्र्यांचा शिक्षक, विद्यार्थ्यांशी संवाद

 जवळपास दीड वर्षांनंतर राज्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये आज सोमवारपासून पुन्हा सुरू होत आहेत. पहिल्या दिवशी मुलांच्या स्वागतासाठी शिक्षणोत्सव साजरा करण्याची सूचना शालेय शिक्षण विभागाने शाळांना के ली आहे. तसेच ‘माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी’ या कार्यक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्व शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांच्याशी आज यूटय़ूबद्वारे संवाद साधणार आहेत. एरवी शाळा असली की मोठय़ांप्रमाणे छोटय़ांचे आयुष्यही घडय़ाळाच्या काटय़ाप्रमाणे धावत असते. सकाळी लवकर उठून, आवरून शाळेची बस पकडणे, पहिली घंटा होण्याआधी शाळेत पोचणे, प्रार्थना वगैरे झाली की विषयानुसार भरणारे वर्ग, त्यात अभ्यासाचा ताण हलका करणारी मधली सुट्टी, खेळाचा, संगीत, चित्रकलेचा तास आणि शेवटच्या तासानंतर शाळा सुटल्याची वर्दी देणारी घंटा वाजली की तिचा आवाज कानात साठवतच घरचा रस्ता धरला जात असे. गेले दीड वर्ष मुलांचे शाळाविश्व ठप्प झाले होते. शाळा ऑनलाइन सुरू असल्या तरी या रोजच्या दिनक्रमापासून, शाळेच्या उत्साही वातावरणापासून, मित्रमैत्रिणी, शिक्षक यांच्यापासून विद्यार्थी दुरावले होते. परंतु, आता ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे तर मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या शहरी भागांतील आठवी ते बारावीचे वर्ग भरणार आहेत.

करोनाकाळात खबरदारीच्या उपाययोजना करत शाळा कशा भरवायच्या याच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. खुद्द शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी तज्ज्ञांच्या मदतीने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केले. त्यानुसार त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त यांच्या मान्यतेने राज्यातील जवळपास बहुतांश भागांतील शाळा सुरू होत आहेत.

शाळेपासून दीड वर्ष दुरावलेल्या मुलांचे स्वागत पहिल्या दिवशी उत्साहाच्या वातावरणात व्हावे, अशी सूचना विभागाने केली आहे. शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करण्यात यावे, त्यासाठी प्रसंगी मुलांच्या घरी भेट द्यावी, मुलांची शाळेतील हजेरी वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शालेय कामकाजाचे तास वाढविण्याकरिता स्थानिक पातळीवर निर्णय घेता येईल. शाळांमध्ये उपस्थितीची विद्यार्थ्यांवर सक्ती करण्यात आलेली नाही. तसेच शाळा सुरू झाल्यावर लगेचच अभ्यास व परीक्षांचे ओझे मुलांवर लादू नये, अशी सूचना तज्ज्ञांच्या कृतिगटाने के ली आहे.

शिक्षक-अधिकाऱ्यांना सूचना

पहिल्याच दिवशी शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, केंद्र प्रमुख, प्राचार्य यांच्या शाळाभेटींचे आयोजन करावे, अशी सूचना करण्यात आली आहे. तसेच त्याच्या नियोजनाची प्रत शिक्षण संचालनालयाला सादर करायची आहे. या भेटीची छायाचित्रे, छायाचित्रण समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करायचे आहे. या पोस्टही कशा पद्धतीने प्रसिद्ध करायच्या, याच्या तपशीलवार सूचना विभागाने केल्या आहेत. पाठय़पुस्तकांचे वितरण करतानाची छायाचित्रेही समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करायची

आहेत. रोज पाच वाजेपर्यंत शिक्षक-विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेऊन ती माहिती शालेय शिक्षण विभागाला सादर करावी लागणार आहे.

शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत १०० टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. करोनाची लस घेतली नाही म्हणून अनुपस्थित राहण्याची मुभा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नाही.

२५ टक्के नागरिकांना दोन्ही लसमात्रा

मुंबई : राज्यात लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांची संख्या २५ टक्के आहे. राज्यभरात १८ वर्षांवरील सुमारे ६१ टक्के नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतली आहे. करोना निर्बंध हळूहळू शिथिल होत असून, राज्यात लसीकरणाचा वेगही वाढल्याचे चित्र आहे.

करोनाचे २,६९२ नवे रुग्ण

राज्यात रविवारी दिवसभरात करोनाचे २,६९२ नवे रुग्ण आढळले. गेल्या २४ तासांत ४१ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात २७१६ रुग्ण करोनामुक्त झाले.

समाजमाध्यमावर गीत

* राज्यातील करोनामुळे विस्कटलेली शिक्षणाची घडी सोमवारपासून रुळावर येणार आहे. करोना, स्थलांतर यांमुळे अनेक भागातील विद्यार्थी शिक्षणापासून दुरावले आहेत.

* या पार्श्वभूमीवर ‘शाळेकडे परत फिरूया..’ असा संदेश देणारे गीत शालेय शिक्षण विभागाच्या मंत्री वर्षां गायकवाड यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केले.

* बॅक टू स्कूल’ नावाच्या हॅशटॅगने हा संदेश अल्पावधीत लोकप्रिय झाला.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments