शब्द लहरी

 

      

 शब्द लहरी 

---------------------------


   निसर्ग

 निसर्गाने मानवांना बरेच काही दिले आहे, परंतु त्यानंतरही माणूस आपल्या स्वार्थासाठी जंगलतोड करतो. जंगले नष्ट करून माणूस तेथे इमारती उभ्या करतोय. दिवसेंदिवस नवीन तंत्रज्ञानाच्या विकासाने नवीन उद्योग तयार होत आहेत, उद्योग बांधण्यासाठी पुरेशी जागा नसल्यामुळे झाडे तोडली जात आहेत आणि मोठ्या उद्योगांमधून निघणाऱ्या हानिकारक धुरामुळेही निसर्गाचे नुकसान होत आहे.

सौ.प्रतिमा अरुण काळे
निगडी प्राधिकरण पुणे,४४

------------------------------
मन 

ढग दाटून येतात,
मन भरून येत.
गर्द निळ्या सायंकाळी
मन पार मागे निघून जात.
कुठेतरी हलत, कुठेतरी झुलत,
कुठेतरी हसत, कुठेतरी रुसत.
भरलेल्या आभाळाकडे बघून
डोळ्यात पाऊस घेऊन येत.
तेवढ्यात कुणीतरी साद घालत.
सगळे ढग परतवून लावत.
आठवणींचा पसारा गोळा करून,
जगाच्या जागी परत याव लागत.

  स्मिता डोंगरे नलावडे
-----------------------------------
अलक
  नवरात्री चे रंग

       " सुषमा  आज कोणता रंग आहे गं " नवरात्रीच्या पहिल्याच माळेला कोणत्या रंगाची साडी घालावी हा प्रश्न मनिषाला पडला .
      " मनिषा काय तू !रंगाचं घेऊन बसली ! आपलं अख्खं आयुष्य कष्टाच्या रंगात भिजलेलं आहे त्या पुढे कोणताही रंग असला तरी फिकाच वाटणार आहे . म्हणुनच म्हणते रंग कोणताही असला तरी तो फक्त बेरंग व्हायला नको ! "

- सुभाष उमरकर, नाशिक.
9022622856
 
-------------------------------------------
 लेख.. नवरात्र उत्सव 

      नवरात्राचा उत्साह सर्वत्र दिसतोय. मंदिरे सजलीत. घरोघरी घटस्थापना झाली आहे. घटाभोवतीच्या मातीतून हिरवे अंकुर फुटू लागलेत. देवीला सुगंधी पुष्पमाला घातलेल्या आहेत. शेजारी सुंदर रांगोळी रेखाटल्या आहेत. अखंड तेवणाऱ्या आनंददीपाच्या ज्योतीच्या प्रकाशाने उजळलेले देवघर सर्वांना सुखावत आहे.*
        प्रसन्न अंतकरणी कुटुंबीय आपल्या कुलदेवीच्या पूजनात रममाण आहेत. प्रत्येकच घराला कुलदेवता आहे. कुलदेवता म्हणजे वडिलधारे सांगतात की.. आपल्या घराण्यातील पूर्वज या देवतेची पुजाअर्चा करायचे. जगावर आजवर कितीतरी संकटे येवून गेलीत. अगदी अनाकलनीय.. अविश्वसनीय वाटावीत अशी, पण तरीसुद्धा आपल्या या कुलदेवतेच्या कृपेने आजही आपले संसार आनंदात सुरु आहेत. आपल्या घराण्याची वंशवेल कधीच खुंटलेली नाही.*
        कुलदेवीच्या कृपेने हे आपले गोकुळ आनंदी आहे. घराण्यावर आईचा वरदहस्त रहावा.. कृपादृष्टी रहावी.. आशिर्वाद लाभावेत म्हणून हा कुलदेवी पूजनाचा वसा मग पुढील पिढीकडे असा जात राहतोय. अशी ही श्रद्धायुक्त परंपरा घरोघरी किती वर्षे सुरु आहे हे सांगणे ही अवघडच.प्रत्येक पूजेवेळी आणि शुभप्रसंगी कुलदेवीचे आशिर्वाद मागितले जातात. पूर्वज सांगतात ते कुलदेवता.. कुलदेवी. त्यांच्यावर अढळ श्रद्धा आहे. आजच्या काळात ही दैवतांची ठिकाणे दूर असली.. मनुष्य जगात कुठेही असला तरीही तो कुलदेवीच्या दर्शनासाठी येतोच. कुलदेवीमुळेच गावाशी प्रत्येकाची नाळ जुळलेली आहे. समाजात एकोपा राहतोय.तसेच 
आरोग्यासाठी नवदुर्गांचे पूजन केले जाते. तसेच नवरात्रीत नऊ दिवस देवीच्या निरनिराळ्या रूपातील नऊ दुर्गांची पूजाही केली जाते. सप्तशती या देवी चरित्रात एक श्लोक आहे तो असा :-
प्रथमम् शैलपुत्रीं च । द्वितीयं  ब्रह्मचारिणी ।।
तृतीयम  चंद्रघंटेति । कुष्मांडेति  चतुर्थकम  ।।
पंचमम स्कंदमातेति । षष्ठम कात्यायनेति च   ।
सप्तम कालरात्रीति । महागौरीति च अष्टकं ।।
नवमम सिध्दिदात्रीच । नवदुर्गा: प्रकीर्तिताः ।।

 असे दुर्गादेवीचे नऊ अवतार असून नवरात्रीमध्ये या नवदुर्गांची पूजा आरोग्यासाठी करतात. 
१. शैलपुत्री -       हिच्या उपासनेने शारीर सुदृढ होते.
२. ब्रह्मचारिणी-   हिच्या उपासनेने स्मरणशक्ति वाढते.
३. चंद्रघंटा -       हिच्या उपासनेने हृदयरोग निवारण होतो.
४.कुष्मांडा -       हिच्या उपासनेने रक्तविकार व वायुविकार नाहीसा होतो.
५.स्कंदमाता -     हिच्या उपासनेने कफाचा नाश होतो.
६.कात्यायनी -     हिच्या उपासनेने कंठरोग व पित्तशमन होते.
७.कालरात्रि -       हिच्या उपासनेने मेंदूचे विकार दूर होतात.
८.महागौरी -        हिच्या उपासनेने रक्तशुद्ध होते.
९.सिद्धिदात्री -      हिच्या उपासनेने बुद्धि व बलवर्धन होते.

आपणही नवदुर्गांचे पूजन करून आरोग्य चांगले ठेऊया. 
असा हा नवरात्र उत्सवाचा कालावधी म्हणजे  आनंदपर्वच
        ॐ कुलदेवताभ्योनमः

         ‼ या  देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभिधीयते ! ‼
       ‼ नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ‼

सौ मधुरा कर्वे. ( भावगंधा )
पुणे.

टिप्पण्या