'सिंधुदुर्ग किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला, नाहीतर कोणी म्हणेल मीच बांधलाय' मुख्यमंत्र्यांचा राणेंवर पलटवार

'सिंधुदुर्ग किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला, नाहीतर कोणी म्हणेल मीच बांधलाय' मुख्यमंत्र्यांचा राणेंवर पलटवार

'सिंधुदुर्ग किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला, नाहीतर कोणी म्हणेल मीच बांधलाय' मुख्यमंत्र्यांचा राणेंवर पलटवार


बाळासाहेबांना खोटं बोलणं आवडत नव्हतं, खोट बोलणाऱ्या लोकांना

 बाळासाहेबांनी शिवसेनेतून काढून टाकलं होतं 


सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील बहुप्रतिक्षीत चिपी विमानतळाचं  आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झालं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे  आणि मुख्यमंत्री  एकाच व्यासपीठावर आले होते. आणि अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांमघ्ये राजकीय जुगलबंदी रंगताना पाहिला मिळाली. नारायण राणे यांनी आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांवर मुख्यमंत्री आणि शिवसेनेला लक्ष गेलं. याला मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात राणे यांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं.

आजचा क्षण आदळाआपट करण्याचा नाही

आजचा क्षण हा आदळआपट करण्याचा नाही तर आनंद व्यक्त करण्याचा आहे, ज्योतिरादित्य  मी तुमचं अभिनंदन करतो, कारण तुम्ही इतकं लांब राहूनही मराठी मातीचा संस्कार विसरला नाहीत. मातीचा एक संस्कार असतो, आणि मातीच्या वेदना काही वेळेला मातीत जाणे, अनेक झाडं उगवता, काही बाभळीची असतात काही आंब्याची असतात. आता बाभळीची झाडं उगवली तर माती म्हणते मी काय करु, जोपासावं लागतं असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकेर यांनी अप्रत्यक्षपणे नारायण राणे यांना टोला लगावला. 

कोकणचं वैभव आपण आज जगासमोर नेत आहोत

माझ्यासाठी हा मोठा सौभाग्याचा दिवस आहे. कारण शिवसेना आणि कोकण हे नातं काही वेगळं सांगायला नको. स्वत कुठेही न झुकणारं मस्तक ते या सिंधुदुर्गात कोकणवासियांसमोर नतमस्तक झालं ते या शिवसेनाप्रमुखांचं. कोणी काय केलं, कोणी काय करावं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. योग्य वेळी बोलेनही कदाचित. पण आजचा हा महत्त्वाचा दिवस आहे. कोकणचं वैभव आज आपण जगासमोर नेत आहोत. जगातील अनेक पर्यटक इथे यावेत यासाठी सुविधा असण्याची गरज आहे. या सुविधांमधील सर्वात मोठा भाग असतो तो विमानतळाचा. आणि त्या विमानतळाचं आज लोकार्पण झालं आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं

आत्मसात करुन बोलणं वेगळं आणि...

पर्यटन म्हटल्यानंतर आपल्यासमोर राज्य येत ते आपल्या शेजारचं गोवा. पण आपली जी काही संपन्नता आहे, वैभव तेही काही कमी नाही. पण सुविधा काय आहे तिकडे, एव्हडी वर्ष विमानतळाला का लागली, एव्हडी खर्डेघाशी का करावी लागली. हे सरकार आल्यावर ते कसं मार्गी लागलं. आजपर्यंत अनेक जण बोलून गेले की कोकणचं कॅलिफोर्निया करु, तेव्हा शिवसेनाप्रमुख बोलले होते की कॅलिफोर्नियाला अभिमान वाटेल असं कोकण निर्माण करु. आज पर्यटानाला उद्योगाचा दर्जा दिला आहे. पाठांतर करुन बोलणं वेगळं, पण आत्मसात करुन तळमळीने बोलणं वेगळं, मळमळीने बोलणं आणखी वेगळं असतं त्याबद्दल  नंतर बोलेन असं सांगत मुख्यमंत्र्यांनी राणे यांना टोला लगावला.

प्रामाणिकपणाने सांगतो गेल्या दीड दोन वर्षात काही वेळेला केंद्रीय मंत्र्यांशी बोलावं लागतं. अनेकदा असं जाणवतं की हे बोलणं नुसतं कोरडं असतं. पण ज्योतिरादित्य यांनी स्वतहून बैठकीची वेळ मागितली. आज सुद्धा मी अभिमानाने सांगतो या काही योजना आहेत त्यातली त्यात आजपर्यंत साडेसहा लोकांना लाभ झाला आजच्या विमानतळाच्या लोकार्पणानंतर आणखी जणांचा त्याचा लाभ होणार आहे. आपण एकत्र येऊन विकास करुया. 

जे काही आधी बोलून गेले आहेत विकासाच्या गोष्टी, त्या मी पुन्हा नाही सांगणार मी एरियल फोटोग्राफी करत होतो, सिंधुदुर्ग किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला, नाही तर कोणीतरी म्हणेल की मीच बांधला, असा खोचक टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

कोकणाची संस्कृती आहे, त्यात मासे आले, कोंबडीवडे आले

कोकणात किल्ले आहेत, निळाशार पाणी आहे, लाल माती आहे, हे सर्व मी एरिअल फोटोग्राफी करत असताना पाहिलं. मग माझ्या मनात विचार आला की यात हवाई वाहतूक आलीच पाहिजे, ती होणारच आहे, आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्याचाही आपला प्रयत्न आहे. चिपी विमानतळ आंतरराष्ट्रीय करण्याबरोबरच इथं एक हेलिपोर्ट पण असलं पाहिजे, आणि हेलिकॉप्टरमधून आपला जो नयनरम्य सागर किनारा आहे त्याची जर आपण हवाई सफर सुरु केली तर एक आगऴं वेगळं पर्यटन आपण देशात सुरु करु शकतो. हे आमचं वैभव आहे. आणि जमिनीवर आल्यावर माझ्या कोकणची संस्कृती मग त्याच्यात मासे आले, कोंबडीवडे आले सर्व गोष्टी आल्या, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी राणे यांना चिमटा काढला. 

खोटं बोलणाऱ्यांना बाळासाहेबांना काढून टाकलं


कोकणच्या विकासाने आजपासून भरारी घेतली आहे, त्याची सुरुवात आजपासून झाली आहे. पण एवड्या चांगल्या गोष्टी असताना नजर लागू नये म्हणून काळा टिका लावावा लागतो. ते लावणारी काही लोकं आहात. नारायणराव तुम्ही बोलला ते खरं आहे, त्याबद्दल तुम्हाला धन्यावाद देतो, पण कोकणची जनता कधीच डोळे मिटून राहत नाही ती शांत आहे, संयमी आहे, पण ती भयभीत होऊ काही तरी करेल असं अजिबात नाही, ती मर्द आहे.  आणि म्हणूनच गेली अनेक वर्ष तीने तिच्या हक्काचा लोकप्रतिनिधी इकडे निवडून दिलेला नाही म्हणूच खासदार विनायक राऊत आहे, मला त्यांचा अभिमान आहे. आणि हेही खरं आहे की बाळासाहेबांना खोटं बोलणं आवडत नव्हतं. खोट बोलणाऱ्या लोकांना बाळासाहेबांनी शिवसेनेतून काढून टाकलं होतं. हा सुद्धा इतिहास आहे. 

दुसऱ्या क्षणाला मी सही केली

आपण आज केंद्रामध्ये मंत्री आहात, लघू, सुक्ष्म का असेना पण मोठं खातं तुमच्याकडे आहे, त्याचा उपयोग महाराष्ट्राला तुम्ही नक्की करुन द्याल ही मला तुमच्याकडून अपेक्षा आहे. विकासामध्ये कुठेही पक्षभेद आणत नाही. मला आठवतं तुम्हाला आठवत नाही, तुमच्या कॉलेजच्या बाबतीत तुम्ही मला फोन केला, मी दुसऱ्या क्षणाला सही केली. कारण जनतेचं कार्य आहे. तिथे मी कोतेपण आणू इच्छित नाही. 

जसं कोकण रेल्वे एक आव्हान होतं, तसंच विमानतळ हे एक आव्हान आहे, रस्त्याचं एक आव्हन आहे, पण सर्व मिळून जसं नितीन गडकरी  पुढे आले. आजपर्यंतचे जे खड्डे मग ते कारभारातील असतील किंवा रस्त्यावरील असतील पडलेत आणि पाडले गेलेत. ते बुजवण्याचं काम आपण एकत्र मिळून करणार नसू तर मग मात्र आपल्याला निवडून देणारे जनतेचं ते दुर्भाग्य आहे. विकासाच्या कामाच्य राजकारणाचे जोडे आणू नका, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या