08 ते 14 ऑक्टोबर 2021 या कालावधीत लसीकरण मोहिम

 08 ते 14 ऑक्टोबर 2021 या कालावधीत लसीकरण मोहिम 

 टास्क फोर्स समिती सभा संपन्न

रत्नागिरी : जिल्ह्यात कोव्हीड-19 लसीकरणाला गती यावी याकरीता 08 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेतंर्गत जिल्ह्यामध्ये कोव्हीड लसचा पहिला डोस न घेतलेल्या नागरिकांना लसीकरण करुन शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या टास्क फोर्स समितीच्या बैठकीत दिली.

        बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, रोटरी क्लबचे सदस्य आदी उपस्थित होते.

          शासनाकडून कोव्हीड लसचा पुरवठा वाढला असून ग्रामीण तसेच शहरी भागातील 18 वर्षावरील नागरिकांना लसीकरण करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.  याकरीता लसीकरणाची वेळ वाढविण्यात येत असून ज्यांच्याकडे आधारकार्ड उपलब्ध नाही अशा नागरिकांना देखील लसीकरण केंद्रावर लसीकरणाची व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी बैठकीमध्ये दिली.  प्रशासनाकडून ग्रामीण भागात प्राथमिक केंद्रनिहाय व शहरी भागात प्रभागनिहाय आढावा घेण्यात येणार असून शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याच्या दृष्टीने अंगणवाडी सेविका, शिक्षक, आशा वर्कर, बचतगट पोलीस पाटील, तलाठी, गटविकास अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांच्या मदतीने लसीकरण न झालेल्या नागरिकांना लसीकरण करण्यात येईल असे जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी सांगितले.

          जिल्ह्यात आत्तापर्यंत 74 टक्के नागरिकांनी पहिला डोस व 31 टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत.  सध्या सणांचे दिवस असल्याने लसीकरणाकरीता नागरिकांमध्ये उत्सुकता कमी झाल्याचे दिसून येत आहे पंरतु असे न करता संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी सर्वांनी लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी केले आहे.


....................................

टिप्पण्या