मुंबई विद्यापीठाला नॅककडून श्रेणी

 


मुंबई विद्यापीठाला नॅककडून श्रेणी

मुंबई विद्यापीठाला नॅककडून श्रेणी


राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये सर्वोत्तम

मुंबई : गेल्या जवळपास साडेचार वर्षांपासून नॅकची श्रेणी मिळण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या मुंबई विद्यापीठाचे मूल्यांकन पूर्ण झाले असून विद्यापीठाला अ प्लस प्लस दर्जा मिळाला आहे. विद्यापीठाला ३.६५ श्रेयांक मिळाले असून राज्यातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत मुंबई विद्यापीठ अव्वल ठरले आहे. त्यामुळे अनेक योजना, निधी, शैक्षणिक निर्णय स्वतंत्र्यात वाढ असे लाभ विद्यापीठाला मिळणार आहेत.

चार वर्षांपूर्वी राष्ट्रीय मूल्यांकन आणि श्रेयांकन परिषदेकडून (नॅक) देण्यात येणाऱ्या श्रेणीची वैधता संपल्यानंतर मुंबई विद्यापीठाचे मूल्यांकनच झाले नव्हते. मात्र, आता नॅकच्या मूल्यांकनाच्या निष्कर्षांनुसार विद्यापीठ राज्यातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत अव्वल ठरले आहे. राज्यातील सर्वोत्तम, ३.६५ श्रेयांक विद्यापीठाने मिळवले असून अ ++  दर्जा पटकावला आहे.

पहिल्या टप्प्यात स्वयंमूल्यमापन अहवाल, दुसऱ्या टप्प्यांत विद्यार्थ्यांच्या मतांचे सर्वेक्षण आणि विद्यापीठाने सादर केलेल्या माहितीची पडताळणी झाल्यानंतर तज्ज्ञ समितीने विद्यापीठाची प्रत्यक्ष पाहणी केली. २४ ते २६ ऑगस्ट दरम्यान पाहणी पथकाने विद्यापीठाला भेट दिली. या पथकाने सादर केलेल्या अहवालासाठी ३० टक्के भारांश आणि विद्यापीठाच्या ऑनलाइन सादरीकरणासाठी ७० टक्के भारांश असे मूल्यमापन करून नॅकने विद्यापीठाला श्रेणी जाहीर केली आहे. अध्यापन, मूल्यमापन पद्धत, संशोधन, व्यवस्थापन, पायाभूत सुविधा, संस्थात्मक मूल्ये यांआधारे विद्यापीठाचे मूल्यमापन करण्यात आले.

होणार काय?

शिक्षणसंस्थांकडे नॅकची श्रेणी असणे बंधनकारक आहे. मुंबई विद्यापीठाला अ ++ दर्जा मिळाल्यामुळे विद्यापीठाला संशोधन प्रकल्प, निधी, योजनांचा लाभ मिळणार आहे. त्याचप्रमाणे ऑनलाइन अभ्यासक्रमांसारखे विविध उपक्रम करण्याचे स्वातंत्र्यही मिळणार आहे.

देशांतील अग्रगण्य विद्यापीठ म्हणून समजल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठाला नॅककडून अ++ श्रेणीसह सर्वोत्कृष्ट मानांकन प्राप्त होणे हे अभिमानस्पद आहे. विद्यापीठाच्या १६४ वर्षांच्या वाटचालीतील हा एक ऐतिहासिक सुवर्णक्षण आहे. ज्ञानदानाची उज्ज्वल आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या विद्यापीठाला मिळालेल्या या सर्वोत्तम श्रेणाीचा फायदा हा विद्यापीठासह सर्वाना नक्कीच होईल. 

                  – प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

स्वयंमूल्यनिर्धारण अहवाल ते नॅक पीअर टीमच्या प्रत्यक्ष भेटीचे विशेष नियोजन करण्यासाठी विद्यापीठाच्या आयक्यूएसी सेल आणि सर्वच घटकांनी अथक प्रयत्न घेतले. सामूहिक प्रयत्नांची ही फलनिष्पत्ती आहे. आता यानंतर मुंबई विद्यापीठाचे पुढील ध्येय असणार आहे ते सर्वसामान्य भारतीय नागरिकांना उच्च व आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण आणि संशोधन सुविधा प्राप्त करून देणारी श्रेष्ठताधारक संस्था (इन्स्टिटय़ूट ऑफ एमिनन्स) म्हणून मान्यता मिळवण्याचे!

      – प्रा. रवींद्र कुलकर्णी,  प्र- कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठाचे मनापासून अभिनंदन. मेहेनत घेणाऱ्या सर्वाचे कौतुक. शैक्षणिक क्षेत्रात विद्यापीठाने आपले स्थान पुन्हा सिद्ध केले आहे.

      – उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री


....................................
------------------------------

www.freshnewz.in

Comments