शब्द लहरी

शब्द लहरी

 "पहाट"

अनुभव लेख.. रम्य पहाट


एप्रिल ,मे मध्ये उन्हाळी सुट्टी लागली की, मी माझ्या आजोळी कोकणात जात असे, नेहमीच.

तिथली पहाट, सकाळ ही खुप वेगळी असते. आपल्या शहरातील लोकांप्रमाणे धावपळीची नसते. पटकन आवरायचं आणि तोंडात कसा बसा नाश्टा भरायचा आणि कामावर रुजू होण्यासाठी पाळायचे. एकच गोंधळ, कलकल, गजबजाट. या पासुन खुप दूर कोकणात माझ्या आजोळी एक पहाटेचे वेगळे  वातावरण अनुभवले आहे. सकाळी घरातील मागील अंगणात गरम पाण्याचा बंब आंघोळी साठी पेटवला जायचा. आजोबा, आजी यांचे सोळे ओळे खुप होते. त्यामुळं त्यांच्या आंघोळी आधी व्हायच्या. पुढे तुळशी वृंदावनापाशी आजी रांगोळी काढून तुळशीची पुजा करायची त्या नंतर.. स्वयंपाक घराकडे जायची. आजोबा फुले आणून सकाळी पूजा झाली की, मोठ्याने स्तोत्र मंत्र म्हणायचे खुप प्रसन्न वाटायचे. हे सर्व अगदी पहाटे सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी होत असे. मात्र सर्वत्र शांतता असायची आणि त्यांची कामे नित्यनेमाने चालायची. मी तिथे गेल्यावर दोन ,तीन दिवस आराम करुन माझ्या मामे बहीण- भावा बरोबर.. पायी चालायला जात असू. सकाळी पूर्व दिशेला हळुहळू आकाशात तांबडे फुटायला लागले असायचे. छान, सुंदर प्रसन्न हलकेशी गार हवा अलगद सुखद वाटायची. शुद्ध हवा घ्यावी ती अशी सकाळची आणि ते देखील कोकणात. आम्ही चालायला टेकडीवर जात असू.. चढता चढता.. सुंदर पक्षांचा किलबिलाट येत असे. हळू हळू आकाश केशरी, पिवळ्या रंगाने उजळून निघू लागे. टेकडीवरून गावातील दिवे पाहिले की ते विझू लागलेले दिसत. पाहता पाहता पूर्व दिशेला दिनकर वर येत असे त्यामुळे  क्षितिज सोनेरी होऊ लागलेले असायचे . अशी सुंदर पहाट अनुभवताना मन प्रसन्न आणि विशाल होई. त्यातुनच आशा ठिकाणीं नक्कीच माणुसकीचे दर्शन घडेल.

तिथे थोडे रेंगाळून आम्ही उतरू लागू आणि घरी आलो की मामी ने केलेला मऊ भात, मेतकूट घातलेले त्यावर तूप आणि   उडदाचा किंवा पोह्याचा भाजलेला पापड ,भरल्या मिरचीचे लोणचे अशा फक्कड नाश्ता वर ताव मारून मन प्रसन्न होऊन जाईल.

अशी ही रम्य पहाट... प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अनुभवावी. लांब देवळा तील आरतीचे सुर कानावर पडत असायचे. सारे गाव जागे होत होते. परंतू शहरासारखी   धांदल, गडबड  दिसत नव्हती. सर्वत्र प्रसन्नता भरून राहिली होती. पहाटेच्या या आगळ्या वेगळ्या भ्रमंती ने खरच मन समृद्ध झाले आहे असे मला वाटायला लागले होते. शीणलेल्या मनावर उत्साह निर्माण झाला. आणि पुन्हा नवीन जोमाने काम करण्याची ऊर्जा या रम्य पहाटेने मला दिली आहे.  ..


सौ मधुरा कर्वे.( भावगंधा )

पुणे.

------------------------------------------------------------

ज्ञानेश्वरीतील   सुंदर  प्रतिमाने



       जैसे  स्वप्नामाजी  देखिजे । ते  स्वप्नचि   साव  आपजे । मग  चेउनिया

 पाहिजे  ।  तव  काही  नाही .


         तैसी  हे  जाण  माया ।  तू  भ्रमतु

आ हासि  वाया । शस्त्रे  हाणतलिया  छाया ।  जैसी  आंगी  ।।


       का  पूर्ण  कुंभ  उलंडला  । तेथ

 बिंबाकारू  दिसे  भ्रंशला  । परी  भानू

 नाही  नासला  । तया  सवे  ।।



       ज्या  प्रमाणे  स्वप्नात  पाहिलेले

विषय  स्वप्नात च  खरे  भासतात  .पण

जागे  होउन  पहावे  तर काही  एक  नसते


       त्या  प्रमाणे  हे  सर्व  भासमय  आहे 

 असे  तू  समज . तू व्यर्थ  भ्रमात  पडला

 आहेस . अरे  मनुष्याच्या  सावलीवर

 ज्या  प्रमाणे  शस्त्राने  प्रहार  केला  तरी

 तो  त्यास  लागत  नाही .


      किंवा  पाण्याने  भरलेले  भांडे  पालथे  केल्यानंतर  त्यातील  सूर्यबिंब

 नाहिसे  होते .पण  खरा  सूर्य  नाश

 पावलेला  नसतो .

   त्या प्रमाणे  आत्म्याचा  नाश  होत  नाही.



       सौ.  शैलजा  जाधव (पाटील)

           चांदवड   नासिक

टिप्पण्या