काव्यपुष्प

 

                                              काव्यपुष्प

..प्रभा..


शेला ओढून किरणांचा

चराचर सुवर्णमय झाले,

रंग रूपेरी लेवून नभांगण

प्रभातीला शृंगारून आले.


..नखाते ज्ञानेश्वर..

      .परभणी.

------------------------------------

शोध सुखाचा  


अरे  माणसा...

आयुष्य संपले तरी खऱ्या सुखाचा

 तुझा शोध संपला नाही...

कारण तू कोणत्या सुखाला कुठे शोधतोस?

श्रीमंतीच्या, धनाच्या आधारे फार 

तर क्षणिक भौतिक सुखे मिळतील...

मृगजळामागे धावून खरी तहान भागत नाही...

किंवा कोणत्याही बाजारपेठांत

 ते विकत घेता येत नाही...

कोणत्याही मंदिरातल्या मूर्तीत 

खरा देव भेटत नाही... ना...

त्याला अनुभवावंच लागतं....

तसं सुख हे मानण्याची, 

अनुभवण्याची गोष्ट आहे...


अरे माणसा...

उगाच तू वणवण फिरतोस ना.. चहूकडे... 

दिशाहीन झाल्या सारखा...

नैराश्याचे रूप घेऊन ....

दगडाच काळीज होऊन...

मनोकांक्षांना मारून ...

एकांतात अश्रुधारा वाहतय ना ..!


अरे माणसा!

नैराश्यात जाऊन कधीच

सुख समृद्धी मिळणार नाही...ना

कारण..

माणूस हा आशेवरच जगतो...

नैराश्याने फक्तं मिळेल ना दुःख...यातना...

या काळोखाच्या जीवनात..!


या अंध:कारमय जीवनातून 

सुटका करून घ्यायची असेल ना...

तर...

स्वयंप्रकाशित हो...

गौतमबुद्धाने सांगितलंच 

"अत्त दीप भव:"...

आधी स्वतः स्वतःला ओळख ...

अन् परिस्थितीला, परिवाराला...

चराचरात परमेश्वर शोध...

सगळ्यांना समजून घे...

उपेक्षितांना मदत कर!

आशा आकांक्षा सिमित ठेव...!


अरे माणसा.

आयुष्याच्या प्रवासात.. जीवनाच्या रणांगणात..

काट्यांना फुलापरी मोडले पाहिजे

पायी रक्ताची मेहंदी तरी 

चार पाऊलं .. चाललं पाहिजे..

यशाचं शिखर गाठण्यासाठी..!


अरे माणसा..!

योग्य सुखासाठी योग्य प्रयत्न केले ,

की अपेक्षित सुखाची सुरुवात होते...

फक्त सुरुवात केली पाहिजे...

नेहमी समाधानी राहिले पाहिजे...

समाधानातच सुख असते..

अन् इथेच खऱ्या सुखाचा शोध लागतो...!!


 ✍️

नितु..

(नितेश. शि. खरोले )

8329454924

रविंद्र विद्यालय/ महाविद्यालय चोपा.

---------------------------------------------------------------

मंगल पहाट

पहाटेच्या वेळी स्वार होऊन  

स्वारी येते सुर्यनारायणाची 

सोनेरी प्रकाशाने उजळून निघे

मंगल पहाट प्रत्येकाची 


सौ मधुरा कर्वे. ( भावगंधा )

पुणे.

-----------------------------------

 शामलाक्षरी

~~~~

जीवन फुलले बळीराजाचे

हिरव्या स्वप्नाचा दिन साजरा

जीवन देतसे पाऊसधारा

सरिता ओसंडे मिळे सागरा ॥ 

जीवन = आयुष्य , पाणी

~~~~

सौ.शामला पंडित(दीक्षित )

प्रणाली प्रकाशन, चिंचवड

---------------------------------------------------

     पहाट   


निशा सरून

गजर पहाटेचा

प्रसन्नतेचा


निर्मळ सृष्टी

ही सोनेरी रूपेरी

मनमंदिरी


पुष्पे सुंदर

सुगंध उधळीत

दु:ख रहित



सौ उषा राऊत

----------------------------------

 हिंदोळा...


मंतरलेल्या

दव थेंबाना

सोनवर्खी उन्हाची

झालर,

अंगणातील

प्राजक्त फुलांचा

हळवासा गंध

बहर!


स्वर वेल्हाळ

पाखरांची

रानभर साद,

मनभावन जळात

ओहळाचा

झुळझुळ नाद!


राजस ऋतूंचा

अनोखा सोहळा,

आणि

तुझ्या आठवांचा

मन डहाळीवर

सुखद हिंदोळा!


■■  सतिश कोंडू खरात

                  वाशिम

           ९४०४३७५८६९

-------------------------------------------------

 संस्कार दाखवा..…


काळ कोणासाठी । थांबून राहतो ।

कोणाची पाहतो । वाट कधी? ।।


काळाने सोडले । मागे सगळ्यांना ।

दुष्ट, दुर्जनांना । नष्ट केले ।।


आज नाही उद्या । आपणही जाऊ ।

त्याच्या आधी गाऊ । भक्तीगीत ।।


केले असणार । भूतकाळी पाप ।

त्यांचा मनःस्ताप । आणू नका ।।


आज करा योग्य । कर्म जगताना ।

अंत हसताना । होण्यासाठी ।।


नैराश्य मिटेल । मन साफ ठेवा ।

गरिबांची सेवा । नित्य करा ।।


अलंकार नाही । संस्कार दाखवा ।

मुलांना शिकवा । नीतिमूल्ये ।।


कोणाच्या हक्काचे । हनन करून ।

जगणे मरून । सम जाणा ।।


अजुची एकच । इच्छा मनातून ।

भारता मधून । द्वेष मिटो ।।


शब्दसखा-अजय रमेश चव्हाण, तरनोळी

ता.दारव्हा, जि.यवतमाळ

मो.८८०५८३६२०७

टिप्पण्या