राजापूर तालुक्यातील पन्नासपेक्षा अधिक ग्रामपंचायतींचे रिफायनरीला समर्थन

 


राजापूर तालुक्यातील पन्नासपेक्षा अधिक ग्रामपंचायतींचे रिफायनरीला समर्थन


४०७४ युवकांचे नोकरीसाठी अर्ज


रत्नागिरी प्रतिनिधी:-

रिफायनरी प्रकल्पाद्वारे राजापूर व देवगड तालुक्यातील तब्बल ४०७४ युवकांनी नोकरीसाठी केलेले अर्ज व राजापूर तालुक्यातील १०१ पैकी तब्बल निम्म्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींनी रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातच व्हावा यासाठी दिलेली समर्थनपत्रे ही प्रकल्पाला मिळणाऱ्या भरघोस प्रतिसादाचे द्योतक आहे आणि हीच राजापूर तालुक्याच्या जनतेच्या मनातील भावना असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता शासन कोणता निर्णय घेते यावर जसे प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे तसे ते तालुक्यात सक्रिय असलेल्या राजकीय पक्षांचे देखील आहे अशी भूमिका शनिवारी रिफायनरी प्रकल्प समर्थक असलेल्या तीन समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाल्यानंतर प्रकल्प विरोधकांनी गेल्या पाच वर्षात किती पर्यावरणपूरक उपक्रम आणले? कोणत्या पर्यटनपूरक योजना राबविल्या? व कोकणात किती रोजगार निर्माण केला? पर्यावरणाची काळजी वाहणाऱ्या प्रकल्प विरोधकांनी मागील तीन ते पाच वर्षात कोकणात किती वृक्ष लावले? अथवा पर्यावरण रक्षणाचे कोणते उपक्रम राबवले? फिनोलेक्स, जिंदाल, अणुउर्जा प्रकल्पासारख्या प्रकल्पांचे विरोधक तेथील जमीन अधिग्रहण पूर्ण झाल्यावर तिथली आंदोलन गुंडाळुन रिफायनरी, आयलॉग जेटीच्या विरोधी आंदोलनात का उतरले? त्यांचा फिनोलेक्स, जिंदाल, अणुउर्जा प्रकल्पा सारख्या प्रकल्पांकरिता असलेला विरोध मावळला आहे काय? असल्यास त्याचे कारण सेटिंग आहे का? मागील दोन वर्षात कोकणात दोन वादळे व महाभयंकर पूर आला त्यावेळेस प्रकल्प विरोधात अवतरणारे एनजीओ व त्याचे दलाल कुठे गायब होते? भारतावर, महाराष्ट्रावर व कोकणात कोविड आजाराचा प्रचंड प्रादुर्भाव झाला व स्थानिक नागरिकांची वैद्यकीय सुविधेअभावी ससेहोलपट झाली. मुंबई, पुणे कडून गावाकडे परतणाऱ्याच्या हालाला तर पारावार नव्हता. त्यावेळेस हे एनजीओ कुठे होते? समर्थन वाढू लागले की उद्योजक आणून उद्योगधंदे निर्माण करू अशी लोणकढी थाप मारणाऱ्या प्रकल्पविरोधकांचे ४२ उद्योजक कुठे हरवले? मागील तीन वर्षात या उद्योजकांनी आपले तोंड का दाखवले नाही? व त्यानंतर उद्योग भवन उभारणीच्या घोषणांसारख्या पोकळ घोषणा का कराव्या लागल्या? घोषणा केलेले उद्योग भवन आता कुठे आहे? मागील तीन वर्षात किती महिला बचतगटांना रोजगार मिळवून देण्यात आला? पापड लोणचे यांच्या व्यवसायाला किती बरकत प्राप्त करून देण्यात आली? व्यवसाय करण्याकरिता महिलांचे मेळावे घेणाऱ्या विरोधकांनी किती महिलांना व्यवसायाकरता अर्थसहाय्य मिळवून दिले? नाणार येथील जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द होऊन जवळजवळ साडेतीन वर्षे लोटली. गुजराती, मारवाडी लोकांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली अशी ओरड करणाऱ्यांनी किती शेतकऱ्यांच्या जमिनी, गुजराती मारवाडयांकडून परत मिळवून दिल्या? वा परत मिळवण्यासाठी कोणता पुढाकार घेतला? जर जमिनी परत घेण्याकरता कोणीच पुढाकार घेतला नसेल अथवा कोणत्याही जमिनी परत मिळवल्या नसतील तर या कारणास्तव आंदोलन करून राहण्यामध्ये कोणता स्वार्थ दडला आहे? " गुजराती मारवाडयांनी जमिनी विकत घेऊन शेतकऱ्यांना लुबाडले हो " अशा आरोळ्या ठोकणाऱ्या स्थानिक नेत्यांनी मग एखाद्या व्यापाऱ्याला आणून स्थानिकांच्या जमिनीचे सौदे, उद्योग भवनाच्या नावाखाली का केले? रिफायनरीला विरोध करणारे सर्वजण एलपीजी सिलेंडर्स व पेट्रोल तथा डिझेलवर चालणारी वाहने वापरणे बंद करणार आहेत काय? विरोध करणाऱ्या या सर्वांच्या मुलाबाळांना जर भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम अशा तेल कंपन्यांमध्ये इतरत्र नोकरी मिळाल्यास ते ती पर्यावरणाच्या कारणास्तव नाकारणार आहेत काय? असे सवाल या समित्यांनी उपस्थित केले आहेत. रिफायनरीमुळे सर्व परिसरात प्रदूषण होते असे जर विरोधकांचे म्हणणे असेल तर भारतात एकूण २३ रिफायनरी आहेत. मग त्यांच्या नजीकच्या शहरांची नावे भारतातील प्रदूषित शहरांच्या यादीत का नाहीत? रिफायनरी मुळे मच्छीमारी संकटात सापडते असे जर विरोधकांचे म्हणणे असेल तर भारतातील सर्व प्रमुख मच्छिमारी केंद्रे रिफायनरी असलेल्या बंदरातच कशी? रिफायनरीमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे आंब्याच्या पिकाची अपरिमित हानी होईल असे म्हणणाऱ्या विरोधकांनी जामनगर रिफायनरीच्या क्षेत्रात कोकणाच्या चार पट जास्त आंब्याचे उत्पादन कसे घेतले जाते याचा खुलासा करावा. उठसुठ माहूल यथे रिफायनरीमुळे प्रदूषण अशी बोंब ठोकणाऱ्यांना तेथे या रिफायनरी मागील ६५-७० वर्षांपासून कार्यरत आहेत हे माहित आहे काय? जर संपूर्ण परिसरात रिफायनरीमुळे भयावह प्रदूषण होत असेल तर चेंबूरची लोकसंख्या या सत्तर वर्षात प्रचंड वेगाने का वाढली व कोकणची लोकसंख्या प्रचंड वेगात का कमी होत आहे? कोकणातील कुटुंबे चेंबूर परिसरात येऊन का स्थायिक झाली? माहूल येथील भारत पेट्रोलियम व हिंदुस्तान पेट्रोलियम येथील रिफायनरीत नोकरी मिळाल्यास कोकणातील किती युवक-युवती ती  नाकारणार आहेत? रिफायनरी प्रकल्प जर विनाशकारी आहे तर भारतात २३ रिफायनरी सुखनैव सुरु कशा? त्यात लाखो कर्मचारी काम करीत असून परिसरात करोडो लोक का राहत आहेत? प्रकल्पाला विरोध करण्यापूर्वी प्रकल्पाची बाजू विरोध करणाऱ्यांनी कधी व कोठे ऐकून घेतली? जर दुसरी बाजूच ऐकून घेतली नसेल तर एकतर्फी निर्णय का घेतला जातोय? लोकशाहीत दुसरी बाजू न ऐकणे न्यायसंगत आहे का? आपण दुसरीच बाजू ऐकून घेतली नसेल तर आपल्या सोबतच इतरांनाही विरोध करण्यास प्रवृत्त करायला लावणे हा गुन्हा नाही काय? व त्या करिता भोळ्याभाबड्या जनतेस नारळावर हात ठेऊन शपथा घ्यायला लावणे यासाठी आपण तुरुंगवास पात्र ठरत नाही का? सद्या प्रकल्पाची कोणतीही अधिसूचना नसताना रिफायनरी कंपनीने मात्र येथील ग्रामस्थांकरीता अव्याहत मोफत रुग्णवाहिका दिलेली असून कोविड प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी ग्रामस्थांना वैद्यकीय सामग्रीचे वाटप केले आहे. तसेच पूरग्रस्तांना भरघोस मदत पाठवली आहे. देशभरातही रिफायनरीनी ऑक्सिजन पूरवलेला आहे. रिफायनरी प्रकल्पांतर्गत नोकरी मिळण्यासाठी राजापूर व देवगड तालुक्यातील तब्बल ४०७४ युवकांनी नोकरीसाठी अर्ज केलेले आहेत. ही संख्या दररोज वाढत आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी विरोधक घेणार आहेत का? राजापुरातील गावांची लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे. लोक शहराकडे स्थायिक होण्यासाठी निघून जात आहेत. गावातील ३० ते ४० टक्के घरे कुलूप बंद असतात. उरलेल्या घरात केवळ वृद्धांचे वास्तव्य असते. शाळांची पटसंख्या कमालीची रोडावली आहे. हे सर्व येथे नोकरी व व्यवसायाच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे घडत आहे. सर्व प्रकल्पविरोधक यात कशी सुधारणा करणार आहेत? बारसू सोलगाव भागात अजिबात विस्थापन नसताना व विस्तीर्ण कातळावर प्रकल्पासाठी पर्याय पुढे आलेला असताना ग्रामस्थांची घरे उठणार आहेत हा जावई शोध कोणत्या लाकूडतोड प्रकल्पविरोधकाने लावला? त्याने पुढे येऊन तालुक्याला सांगावे. रिफायनरीबाबत तालुक्याच्या मनात असलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे एनजीओ व प्रकल्प विरोधकांनी द्यावीत असे आव्हानच प्रकल्पसमर्थक समित्यांनी दिले आहे.

...................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या

news.mangocity.org