कोकण कृषी विद्यापीठाचं नक्की चाललंय तरी काय? - मिथिलेश देसाई


कोकण कृषी विद्यापीठाचं नक्की चाललंय तरी काय? - मिथिलेश देसाई

लांजा: महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठ असून त्यापैकी सर्वात जास्त नावरूपात असलेलं म्हणजे दापोली मधील बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ. दरवर्षी या विद्यापीठातून शेकडो विद्यार्थी कृषी पदवीधारक होऊन बाहेर पडतात. परंतु शेतकऱ्यांमध्ये या विद्यापीठाबाबत कमालीची उदासिनता दिसून येते. असा प्रश्न तरुण शेतकरी तथा संभाजी ब्रिगेडचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मिथिलेश देसाई यांनी उपस्थित केला आहे.

          कोकण कृषी विद्यापीठामार्फत संशोधनाच्या नावावर शून्य काम आहे. गेल्या कित्येक वर्षात काजू, आंबा, फणस ह्या फळपिकांच अजिबात संशोधन झालेल नाही. 

रत्नागिरी जिल्हा हा फलोत्पादन जिल्हा आहे पण कित्येक वर्षांपासून फळ झाडांमध्ये फक्त मोजक्या ठराविक व्हरायटीची लागवड झाली आहे. काजू मध्ये वेंगुर्ला ४ आणि ७ ह्याच व्हरायटी आहेत. पुस्तकात लिहिलं गेलं आहे की एका झाडापासून १५ ते १८ किलो काजू बी मिळते पण प्रत्यक्षात ६ ते ८ किलोच मिळते. पूर्वी काजू पिकाला रोग नव्हता पण आता खोडकिड्याचा रोग आला, सोबत कीटकनाशकाच्या फवारण्या आल्या आणि झाडांचा एकंदर खर्च वाढला आहे. हापूस आंब्याला १० ते १५ फवारण्या करायला लागतात त्या मुळे त्याचा देखील खर्च वाढला आहे. फणस व इतर पिकांवर काहीच संशोधन नाही. कोकण कृषी विद्यापीठाला खूप वर्षांनी कोकण चे सुपुत्र असलेले संजय सावंत कुलगुरू म्हणून लाभले आहेत. संजय सावंत यांनी केंद्रातून आणि राज्यातून संशोधनासाठी मोठ्या प्रमाणावर काम करायला हवे अशी इच्छा कोकणातील शेतकऱ्यांची आहे.

रत्नागिरी जिल्ह्याचं कृषी विज्ञान केंद्र लांजा तालुक्याला आहे पण पाहिजे तितकं पाठबळ त्याला मिळत नाही अशी शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्ह्याच्या कृषी विज्ञान केंद्राला एकही गाडी नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या शेतावर जायचं असेल तर स्वतःच्या गाडीने फिरावं लागत. विद्यापीठाला प्रत्येक बजेट मध्ये शेकडो कोटी रुपये येतात आणि तो पैसा अधिकाऱ्यांच्या गलेलठ्ठ पगारा व्यतिरिक्त कुठे खर्चला जातो हा पण एक संशोधनाचा भाग आहे.

         फलोत्पादन जिल्ह्याच्या कृषी विज्ञान केंद्राला एक होर्टीकलचरिस्ट नाही कित्येक वर्षे ती जागा रिक्त आहे. रत्नागिरी जिल्ह्यात हुशार होर्टीकलचरिस्ट अधिकारी असताना पण जागा अजूनही रिक्त आहे. संशोधनचा भाग म्हणायचा झाला तर कोकण कृषी विद्यापीठाकडे ओले काजूगर सोलायचे मशीन निर्माण करण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. मशीन डेव्हलप केलं गेलं पण त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. किमान ९५% सक्सेस रेट असलेलं ऑटोमॅटिक मशीन विकसित केलं पाहिजे आणि जर कोकण कृषी विद्यापीठाला हे शक्य नसेल तर नामांकित आयआयटीच्या विद्यार्थ्यांकडून अस मशीन विकसित करून घ्यावे. जे मशीन विकसित केले गेले आहेत त्याचा डामडौल करून कार्यक्रम करण्यात येतो पण प्रत्यक्षात त्याचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नाही. कोकण कृषी विद्यापीठाची कार्यकारी परिषद आहे. जी व्यवस्थापन समिती विद्यापीठाचे सगळे निर्णायक निर्णय घेते. त्या समितीवर भाजप सरकारच्या वेळेला काही नेमणुका करण्यात आल्या होत्या त्यात अद्याप ही बदल करण्यात आला नाही. महाविकास आघाडी सरकार मध्ये प्रत्येक पक्षाच्या नवीन आमदारांची तातडीने नेमणूक केली पण शोकांतिका म्हणजे आज ही त्या परिषदेच्या व्यवस्थापन समितीवर विदर्भ, मराठवाडा ह्या भागातील शेतकरी आहेत. "कोकण कृषी विद्यापीठ" पण शेतकरी इतर भागातील का घेण्यात आले किंवा घेतले तर आता हा बदल कुणी करून आणायचा किंवा कोकणातील शेतकरी तितके हुशार नाहीत का? की बाहेरच्या भागातील शेतकरी घ्यावे लागले आहेत असे अनेक प्रश्न उत्पन्न झाले आहेत. 


         गेले कित्येक महीने सतत हे प्रश्न विद्यापीठाच्या आणि सरकारच्या निदर्शनास आणून देखील काहीच फरक पडला नसल्याने हे जाणीवपूर्वक केले जात आहे का असा प्रश्न शेतकऱ्यांचा मनात पडतो. कोकण कृषी विद्यापीठाने संशोधनावर भर द्यावा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय द्यावा आणि जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या शेतकऱ्यांना कोणत्या गरजा आहेत किंवा रस्ते नाहीत वगैरे अडचणी काय आहेत किंवा त्यांना संशोधन करायला कसली आवश्यकता आहे ह्याची नोंद घेऊन त्यांना पाठबळ द्यावं आणि कुलगुरू साहेबांनी ह्यात वैयक्तिक लक्ष घालावे अशी मागणी मिथिलेश देसाई ह्यांनी एक तरुण शेती व्यावसायिक म्हणून केली आहे.

...................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या