प्रसिद्ध नाटककार, लेखक जयंत पवार यांचे निधन




जयंत पवार: वास्तवाशी भिडणारा पत्रकार, लेखक, नाटककार!


प्रसिद्ध नाटककार, लेखक जयंत पवार यांचे निधन

अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा खंदा पुरस्कर्ता हरपल्याची भावना


प्रयोगशील लेखक, संवेदनशील विचारवंत, समाजातील समस्यांच्या मुळाशी जात आपल्या कथा-नाटय़लेखनातून तो भावानुभव बोलका करणारे नाटककार जयंत पवार यांचे रविवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी लेखिका-पत्रकार संध्या नरे आणि मुलगी असा परिवार आहे.

जयंत पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी बोरिवली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. जयंत पवार यांच्या निधनामुळे अभिव्यक्तिस्वातंत्र्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरणारा आणि सामाजिक, राजकीय प्रश्नांवर निर्भयपणे भूमिका घेणारा लेखक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

गेली सात-आठ वर्षे जयंत पवार कर्करोगाशी झुंज देत होते. आजारपणातही त्यांनी आपले लेखन, चिंतन सोडले नाही. शेवटपर्यंत ते लिखाणात मग्न होते. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची नोंद घेत, ते त्यावर भाष्य करत होते. अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा त्याविरोधात प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून त्यांनी लढा दिला. सामाजिक – राजकीय परिस्थितीचे भान ठेवत अन्याय्य घटनांवर आपल्या नाटकांतून-साहित्यातून प्रकाश टाकणाऱ्या जयंत पवार यांच्यासारख्या भाष्यकाराची उणीव कधीही भरून निघणार नाही. विद्रोही सांस्कृतिक चळवळीतील त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना स्मशानभूमीत गाण्यांतून अखेरची मानवंदना दिली.

अस्सल गिरणगावकर असलेल्या जयंत पवार यांनी गिरणगाव ते महानगर हा मुंबईचा झपाटय़ाने बदलत गेलेला चेहरामोहरा फार जवळून अनुभवला. गिरण्या बंद पडल्यानंतर विस्थापित झालेले कामगार, बेरोजगारी-गरिबीसारख्या समस्यांशी तोंड देताना अगतिक, असाहाय्य होत गेलेल्या या शहरातील सर्वसामान्यांचे जगणे त्यांच्या नाटकांमधून प्रभावीपणे उतरले. ‘माझं घर’, ‘अधांतर’, ‘काय डेंजर वारा सुटलाय’, ‘टेंगशेंच्या स्वप्नात ट्रेन’ या त्यांच्या नाटकांनी मराठी रंगभूमीवर स्वतंत्र ठसा उमटवला. ‘अधांतर’ या नाटकाने राम गणेश गडकरी महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशन ललित साहित्य गौरव, नाटय़दर्पण आदी १४ लेखन पुरस्कार मिळवले. या नाटकाचे हिंदी, इंग्रजी भाषेतही अनुवाद झाले आणि पुढे या नाटकावर आधारित ‘लालबाग परळ’ चित्रपटही आला.

जयंत पवार यांच्या ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकानेही अनेक पुरस्कार मिळवले. मुंबईसारख्या महानगरातील लोकांच्या जगण्याचा संदर्भ घेऊन लिहिल्या गेलेल्या त्यांच्या नाटकांनी रंगभूमीवर वास्तवावर आधारित नाटकांचा आपला एक वेगळा प्रवाह निर्माण के ला. त्याचबरोबर प्रांत-भाषेच्या सीमारेषा ओलांडून त्यांच्या नाटकांतील आशय अनेकांच्या मनाला भिडला. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवरचे सखोल चिंतन आणि तात्त्विक-वैचारिक  मननातून उतरलेल्या त्यांच्या कथा आणि नाटकांचा आशय हा वैश्विक आहे, कालातीत आहे. त्यामुळेच त्यांचे विविध स्वरूपातून, शैलीतून आलेले लेखन लोकांच्या मनाला भिडले.

जयंत पवार यांनी १९७८ साली त्यांनी नाटय़लेखनाला सुरुवात के ली होती. कथाकार, नाटककार, पत्रकार, नाटय़समीक्षक अशी बहुआयामी ओळख असलेले पवार १९८६ पासून पत्रकारितेशी जोडले गेले होते. ‘चंदेरी’, ‘नवशक्ती’, ‘आपलं महानगर’, ‘सांज लोकसत्ता’, ‘लोकसत्ता’ आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’ या वर्तमानपत्रांमधून त्यांनी पत्रकारिता के ली. नाटय़समीक्षक म्हणूनही गेल्या तीन दशकांमध्ये के लेल्या नाटय़समीक्षणांमधून त्यांनी आपली दांडगी ओळख निर्माण के ली होती. वृत्तपत्रीय लेखन, समीक्षण, भाषणे – मुलाखती अशा विविध स्वरूपांतील लेखन करणाऱ्या पवार यांनी नाटक आणि कथा या दोन्ही साहित्यप्रकारात आपली स्वतंत्र ओळख निर्माण के ली. दरवेशी, मेला तो देशपांडे, कार्य सिध्दीस नेण्यास श्री (अ)मसर्थ आहे, दुजा शोक वाहे, लिअर, विठाबाईचा कावळा, जळिताचा हंगाम, शेवटच्या बीभत्साचे गाणे अशा २३ एकांकिकांचे लेखन त्यांनी के ले होते. १९९१ साली दूरदर्शनसाठी अरविंद गोखले यांच्या कथांवर आधारित ‘कथनी’ या मालिके च्या काही भागांचे पटकथा आणि संवाद लेखन त्यांनी के ले होते. ‘दु:खाचे श्वापद’ या मराठी आणि ‘ब्रेकिं ग न्यूज’ या हिंदी चित्रपटासाठीही त्यांनी पटकथा आणि संवादलेखन के ले होते. त्यांच्या ‘चंदूच्या लग्नाची गोष्ट’ या कथेवर विश्वास पाटील दिग्दर्शित ‘रज्जो’ चित्रपट बेतला आहे. त्यांच्या ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या पहिल्याच कथासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवले गेले. याच कथासंग्रहातील ‘६७२ रुपयांचा सवाल, अर्थातच युद्ध आमुचे सुरू..!’ या कथेवर आधारित ‘भाऊबळी’ चित्रपटही पूर्ण झाला आहे. ‘वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा’ हा त्यांचा कथासंग्रह २०१५ साली प्रकाशित झाला. तर लोकवाङ्मय गृहाने प्रकाशित के लेला ‘मोरी नींद नसानी होय!’ हा त्यांचा अखेरचा कथासंग्रह ठरला आहे.

सामाजिक सलोख्यासाठी, अभिव्यक्तिस्वातंत्र्यासारख्या मूलभूत अधिकारांसाठी पवार यांनी कायम आवाज उठवला. प्रसंगी सरकारविरोधात भूमिका घेतानाही त्यांनी कशाचीही पर्वा केली नाही. त्यांनी तेराव्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषवले होते. तर २०१५ साली झालेल्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते. अत्यंत प्रथितयश, विनम्र, सर्जनशील, आपल्या विचारांवर ठाम राहणारा आणि त्यासाठी संघर्ष करावा लागला तरी तो निर्भीडपणे करणारा जयंत पवार यांच्यासारखा लेखक आणि नाटककार पुन्हा होणे नाही, अशीच भावना जनमानसांतून व्यक्त होत आहे.

श्रद्धांजली

एक संवेदनशील लेखक आपण गमावला आहे. मुंबईतील नजरेआड गेलेल्या गिरण्याकष्टकरी आणि त्यांची गिरणगाव संस्कृती पवार यांच्या शब्दरूपाने जिवंत आहे.

– उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री 


....................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या