नोकरदार महिलांसाठी राज्यात ५० वसतिगृहे

मुंबई : नोकरी करणाऱ्या महिलांसाठी केंद्र सरकारतर्फे  राबवल्या जाणाऱ्या वसतिगृह योजनेला राज्यात गती मिळणार आहे. मुंबई, पुणे, ठाणे या महानगरांप्रमाणेच जिल्ह्यांच्या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांसाठी ५० वसतिगृहे सुरू करण्यात येणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी हा निर्णय घेण्यात आला.मुंबई उपनगर जिल्ह्यात ६, मुंबई शहरात ४, ठाणे जिल्ह्यात ४, पुण्यात ४ आणि राज्यातील अन्य ३२ जिल्ह्यांत प्रत्येक एक याप्रमाणे महिलांसाठी वसतिगृहे उभारली जातील. प्रत्येक वसतिगृहाची क्षमता १०० असेल. वसतिगृहाच्या इमारतींसाठी १ कोटी ५० लाख तर भाड्यासाठी १ लाख ५० हजार रुपये याप्रमाणे प्रतिवर्षी ७५ लाख खर्चास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.यापूर्वी ही योजना केंद्र आणि स्वयंसेवी संस्था यांच्या ७५:२५ अशा सहभागातून राबविण्यात येत होती. आता नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह बांधण्यासाठी वा वसतिगृहाची इमारत भाडेतत्त्वावर उपलब्ध करून अनुदान देण्याची सुधारित योजना राबविण्यात येणार आहे. यात केंद्र, राज्य, स्वयंसेवी संस्था यांच्या हिश्शाचे प्रमाण अनुक्रमे ६०:१५:२५ असे राहणार आहे. वसतिगृह योजना राबविण्यास इच्छुक संस्थेला त्यांच्या इमारत भाड्यापोटी वार्षिक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. वसतिगृह प्रवेश आणि त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांबाबत नियम, अटी-शर्ती या पूर्वीच्या योजनेप्रमाणेच राहतील.वसतिगृहांच्या सोयीमुळे गरजू महिलांना सुरक्षित निवासाचे ठिकाण मिळणार असल्याने त्यांच्या प्रगतीच्या संधी विस्तारतील. नोकरीसाठी प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहात ३० टक्के जागा राखीव असतील. – यशोमती ठाकूर, महिला व बालविकासमंत्री

.......................................
------------------------------

Comments