रात्रीच्या गस्तीचा मुंबई पोलिसांना धसका




 रात्रीच्या गस्तीचा मुंबई पोलिसांना धसका



मुंबई:-करोनाचा वाढता संसर्ग, त्यामुळे पडणारा ताण आणि त्यात रात्रीच्या वेळी मुंबई शांत राहावी यासाठी अनेक वर्षापासून सुरू असलेली रात्रीच्या गस्तीची पद्धत, यामुळे मुंबई पोलिसांना प्रचंड ताणतणाव जाणवतो. निवृत्तीच्या जवळ आलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) यांना अशा गस्तीचा सर्वाधिक फटका बसतो. काही दिवसांपूर्वी अशाच ताणतणावामुळे एका 'एसीपी'चे निधन झाल्याने पोलिसांमध्ये रात्रीच्या गस्तीचा प्रचंड धसका आहे.कधीही न झोपणारे शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. रात्रीच्या अंधारात अनेक गैरधंदे चालतात. वरिष्ठ अधिकारी कर्तव्यावर नसताना पोलिस ठाण्यांचे काम सुरळीत चालावे, यासाठी मुंबईत पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना रात्रीच्या गस्तीची ड्युटी लावली जाते. पोलिस ठाण्यांना भेटी देणे, ठाणे अंमलदाराकडून पोलिस ठाण्यातील कामाची माहिती घेणे, बार, दुकाने तसेच इतर आस्थापना वेळेत बंद झाली की नाही हे तपासणे, गल्लीबोळात गस्त घालून संशयास्पद हालचालींवर नजर ठेवणे, काही अनुचित प्रकार किंवा दुर्घटना घडल्यास घटनास्थळी भेट देऊन मार्गदर्शन करणे ही सर्व कामे गस्तीवर असलेल्या पोलिस अधिकाऱ्याला करावी लागतात. रात्री ११ ते पहाटे ५पर्यंत 'नाइट राऊंड' करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला कर्तव्यावर राहावे लागते.करोना संकटात 'धारावी पॅटर्न'मुळे चर्चेत आलेले सहाय्यक पोलिस आयुक्त रमेश नांगरे यांचे मार्चमध्ये निधन झाले. दिवसपाळी, रात्रीची गस्त आणि पुन्हा ड्युटी अशा ताणामुळे त्यांचे निधन झाल्याची चर्चा पोलिस दलात आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस आयुक्त हे साधारणत: ५५ ते ५८ वर्षे वयोगटात असतात. निवृत्तीच्या जवळ आलेल्या या अधिकाऱ्यांना ताणतणावामुळे मधुमेह, रक्तदाब यांसारख्या व्याधीही जडलेल्या असतात. अशातच रात्री गस्त करावाी लागत असल्याने कामाचा प्रचंड ताण पडतो.


मुंबईसाठी आवश्यक!

मुंबईसारख्या शहरात रात्रीची गस्त आवश्यक असल्याचे सेवानिवृत्त अधिकारी सांगतात. तेव्हाचे गुन्हेगारी विश्व ते आताच्या नाइट लाइफपर्यंत सर्वकाही नियमात ठेवायचे असल्यास वरिष्ठ अधिकारी रात्रीच्या गस्तीवर असणे गरजेचे आहे. परंतु या अधिकाऱ्यांना दिवसरात्र सलग ड्युटी न देता रात्र गस्तीच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी मिळायला हवी. वरिष्ठ निरीक्षकाकडे पोलिस ठाण्याची जबाबदारी असल्याने तसे होताना दिसत नाही. त्या अधिकाऱ्याला दुसऱ्या दिवशीही पोलिस ठाण्यात हजर राहावे लागते. अपुरी झोप, अवेळी खाणे याचा आरोग्यावर परिणाम होतो, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.





........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112








Comments