खलाशाचा खून करुन मृतदेह फेकला पाण्यात
शहरातील मिरकरवाडा जेटी येथील पाण्यात शनिवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्या तरुणाची ओळख पटली असून तो नेपाळी असून, त्याचा खून करण्यात आल्याच्या संशयातून त्याच्या भावाने शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. सुनील जितलाल चौधरी (मूळ रा. नेपाळ सध्या रा.मिरकरवाडा,रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत त्याचा भाऊ प्रकाश जितलाल चौधरी (२२, मूळ रा.नेपाळ सध्या रा.लांजा) याने शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, सुनील हा शुक्रवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास गावातील काही लोकांसोबत हनिफ वस्ता यांच्या बोटीवर काम करत असताना शौचालयाला गेला होता. त्यानंतर शनिवारी सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह मिरकरवाडा जेटीजवळ पाण्यावर तरंगताना आढळला.
उत्तरीय तपासणीत सुनीलच्या कपाळावर आणि छातीवर जखमा झालेल्या आढळल्या आहेत. त्या मृत्यूपूर्वीच्या असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे अज्ञातांनी सुनीलला कोणत्यातरी वस्तू किंवा हत्याराने मारुन त्याचा मृतदेह पाण्यात टाकला असल्याच्या संशयातून भाऊ प्रकाशने शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत.

Comments
Post a Comment