आता निवती, आचरा बंदरात सुरक्षा रक्षक तैनात
मालवण किनारपट्टीवर गस्तीसाठी उपलब्ध करण्यात आलेली गस्तीनौका शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे मिळाली आहे. तसेच आता निवती आणि आचरा बंदर येथे मत्स्य व्यवसाय विभागाचे सुरक्षा रक्षक चौवीस तास तैनात राहणार आहेत. यामुळे या बंदरातील बेकायदेशीर मासेमारीला आळा बसेल, अशी माहिती शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांनी दिली.
किनारपट्टीवर बेकायदेशीरपणे हायस्पीड बोटींचा वावर वाढल्यानंतर आपण आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांचे लक्ष वेधले होते. यामुळे शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात आल्यानंतर गस्तीनौका उपलब्ध झालेली आहे. या गस्तीनौकेबरोबरच मत्स्य व्यवसाय विभागाचे सुरक्षा रक्षक निवती आणि आचरा बंदर येथे कार्यरत असणार आहेत.
जेणेकरून टोकन घेऊन जाणारी बोट ही अधिकृत आहे, की बेकायदेशीर तसेच अनधिकृत मासेमारी सुरू आहे काय, किनाऱयावर येणारी मासळी कोणत्या बोटीतून आली, याचीही माहिती उपलब्ध होणार आहे. पारंपरिक मच्छीमारांची यासंदर्भात अनेक वर्षांची मागणी आज पूर्ण झाल्याबद्दल समाधान वाटत असल्याचेही जोगी यांनी स्पष्ट केले.

Comments
Post a Comment