“एका 'युवराजला' वाचवायला महाराष्ट्रालाच का खोटे ठरवताय?”; भाजपा नेत्याचा शिवसेनेला टोला
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक करून अलिबाग न्यायालयात हजर केले, त्यावेळी कोर्टाने पुराव्याअभावी पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावत अर्णब गोस्वामींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या निर्णयावरुन भाजपाने शिवसेनेला टोला लगावला आहे. रोज अस्मितेची ढाल काढून त्यामागे लपणे तुम्ही आधी थांबवा अशा शब्दात भाजपा नेते आशिष शेलार यांनी समाचार घेतला आहे.
याबाबत आशिष शेलार म्हणाले की, अन्वय नाईक यांना न्याय मिळायलाच हवा, पण एक मराठी कुटुंब उभे करुन तुम्ही रिया चक्रवर्तीला का वाचवताय? एका मराठी कुटुंबाची ढाल करुन "दिशा सालीयन" बाबत बोलणाऱ्यांची तोंड का बंद करताय? बात और भी निकलेगी...त्यावेळी आमच्या महाराष्ट्र पोलिसांनी केलेला तपास आणि संपूर्ण पोलीस दल यांना खोटे ठरवून आता एका "सिंह" यांना "परमवीर" का देताय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्याचसोबत खरी नौटंकी तर हीच आहे. एका "युवराजला" वाचवायला महाराष्ट्रालाच का खोटे ठरवताय? पत्रपंडित हो,अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या सदऱ्यावर दिसू लागलेत? न्याय दंडाधिकाऱ्यांनी दिलेला निवाड्यातील काही मुद्दे असे की, १) २०१८ सालच्या घटनेबाबत कोणताही ठोस पुरावा आलेला नाही त्यामुळे "अ" समरी अहवाल (क्लोजर रिपोर्ट) स्विकारला गेला. २) पोलीस कोठडीचे सर्थन करणारे कोणतेही योग्य, संयुक्तिक व कायदेशीर कारण आढळत नाही. ३) पोलिसांना मोघमपणे तपास करता येणार नाही असं म्हटलं आहे. सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी आणि महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच्या सुडबुध्दीचा, असहिष्णुतेचा पर्दाफाश न्यायालयाने असा केला असा घणाघात आशिष शेलारांनी केला.
दरम्यान, आता न्यायालयालच महाराष्ट्र द्रोही आहे म्हणून फटाके फोडणार का? आता अग्रलेख न्यायालयावर..? खंजीर, तलवार, इतिहासातील शब्दांवर उगाच सगळा भार! उडवा उडवा, शब्दांचे फुलबाजे उडवा! रोज उघडे पडा!! असा चिमटाही शेलारांनी शिवसेनेला आणि खासदार संजय राऊत यांना लगावला आहे.

Comments
Post a Comment