शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी नवा कायदा



महिलांवर अत्याचार रोखण्यासाठी आंध्र प्रदेशातील दिशा कायद्याप्रमाणे कायदा अधिवेशनात मंजूर करण्यात येईल तसेच शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी लवकरच कायदा करण्यात येईल, असा कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असेल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी दुपारी अमळनेर येथे दिली.

वरणगाव येथे एसआरपीएफ बटालियन सुरू करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. अमळनेर येथील पोलीस वसाहतीचे उद‌्घाटन व एरंडोल पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचे ऑनलाईन उद‌्घाटन त्यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील होते. गृहमंत्री देशमुख यांनी शेतकऱ्यांविषयी न्याय देण्याची मोहीम राबवल्याबद्दल आणि कायद्याची मागणी करणाऱ्या प्रतापराव दिघावकर यांचे अभिनंदन केले. 

५ कोटी मिळवून दिले

प्रताप दिघावकर म्हणाले, नाशिक विभागाचा कारभार स्वीकारताच शेतकऱ्यांची फसवलेली ५ कोटी रक्कम मिळवून दिली तर १६६ व्यापाऱ्यांकडून दिवाळीपूर्वी रक्कम देण्याचे लेखी घेतले आहे. शासनाने कायदा करावा. 
पोलीस स्टेशनला आल्यावर महिलांना माहेरी आल्यासारखे वाटेल आणि पोलीस अधिकाऱ्याच्या समोर शेतकऱ्याला बसायला खुर्ची मिळेल तोपर्यंत पोलीस स्टेशन लोकाभिमुख होणार नाही, असे त्यांनी सांगितले.


टिप्पण्या

news.mangocity.org