पालशेत समुद्रात मच्छीमार बोट बुडाली

 


समुद्रातील खराब हवामानामुळे गेली दोन महिने जयगड येथे अडकलेली श्री सोमनाथ नावाची मच्छीमार नौका मुंबईच्या दिशेने जात असताना गुहागर तालुक्यातील पालशेत समुद्रात बुडाल्याची घटना बुधवारी पहाटे ४.३० वाजता घडली. मात्र, या दुर्घटनेतील सर्व खलाशी सुखरुप आहेत.

या बोटीवरील ६ खलाशी व १ तांडेल यांनी बोट वाचवण्याचा अखेरपर्यंत प्रयत्न केला. मात्र, नाईलाज झाल्याने समुद्रात उड्या टाकत त्यांनी आपला जीव वाचवला. तब्बल दोन तासांनी ते किनाऱ्यावर सुखरूप पोहोचले. समुद्रातील वादळाच्यावेळी मुंबईतील श्री सोमनाथ ही मच्छिमारी नौका जयगड किनाऱ्यावर येऊन पोहोचली होती.

गेले दोन महिने याच परिसरात ही नौका मच्छिमारी करत होती. ही नौका बुधवारी मुंबईच्या दिशेने निघाली होती. पालशेत बंदर परिसरातून ही नौका पुढे जात असताना पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास बोटीत पाणी भरू लागले. संकट ओळखून तांडेलने नौका वेगाने किनाऱ्याच्या दिशेने आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाणी वाढतच गेले.

अखेर पालशेत बंदरापासून ४ वाव खोल समुद्रात बोट बुडाली. बोट आता बोट वाचणार नाही हे लक्षात येताच ६ खलाशांसह तांडेलांनी समुद्रात उडी घेतली. सकाळी ६.३० पोहोचले. पोलिसांना याबाबतचे वृत्त मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बोट बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यात यश आले नाही. दुर्घटनेत बोटोचे पूर्णत: नुकसान झाले आहे.

मत्स्य व्यवसाय खात्याचे अधिकारी देसाई याप्रकरणात अधिक तपास करीत आहेत. या बोटीचे मालक नितीन नथुराम मोंडे हे मुंबईतील आहेत. बोटीवर राहूल संतोष दाभोळकर हे तांडेल म्हणून काम करत होते. तर अक्षय संतोष दाभोळकर, समीर संतोष दाभोळकर, सूर्यकांत शंकर भाटकर, जगदीश जगन्नाथ चिवेलकर,भरत लक्ष्मण भोमे, हरेश शंकर पाचकुडे अशी मच्छिमारांची नावे आहेत.

Comments