सत्य कधीच बदललं जाऊ शकत नाही, रिया चक्रवर्तीच्या वकिलाची प्रतिक्रिया


   

                                                                  

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाबाबत आता दिल्लीतील एम्स हॉस्पिटलने मोठा खुलासा केला आहे. सुशांतने आत्महत्याच केली आहे, असं शिक्कामोर्तब एम्सने केले आहे. त्यानंतर आता अटकेत असलेल्या रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.'सत्य कोणत्याही परिस्थितीमध्ये बदललं जाऊ शकत नाही. रिया चक्रवर्तीच्या वतीने आम्ही कायम सांगत आलोय. पण काही माध्यमांमध्ये रियाबाबतच्या बातम्या विशिष्ट हेतूने पेरल्या जात आहेत. मात्र, आमचा सत्यावर विश्वास आहे. सत्यमेव जयते, अशी प्रतिक्रिया , रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली.दरम्यान, सुशांत प्रकरणात  दिल्लीतील​ अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) च्या डॉक्टरांच्या टीमने सीबीआयकडे आपला अहवाल सुपूर्द केला आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  AIIMS च्या डॉक्टरांनी सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली असावी, या थेअरीला नकार दिला आहे. सुशांतची हत्या झाली नाही, असं या डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. सुशांतच्या कुटुंबियांनी आणि त्याच्या वकिलांनी सुशांतला आधी विष देऊन मारले आणि नंतर गळफास देण्यात आला असा आरोप केला होता.पण AIIMS च्या डॉक्टरांनी या प्रकरणाचा पूर्ण तपास केला.  सुशांतच्या गळ्यावर असलेले ligature मार्क आणि शवविच्छेदनात स्पष्ट करण्यात आलेली मृत्यूची वेळ व इतर तथ्यांनुसार, सुशांतची हत्या झाली असावी असं म्हणता येणार नाही, असं डॉक्टरांच्या टीमने स्पष्ट केले आहे.

14 जून रोजी सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील वांद्रे परिसरातील आपल्या राहत्या घरात गळफास घेतला होता. सुरुवातील या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी केला होता. मुंबई पोलिसांनी सुशांतने आत्महत्या केली, असं स्पष्ट केले होते. परंतु, सुशांतने आत्महत्या केली नसून हत्या केली, असा आरोप कुटुंबीयांनी केला होता. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली होती. अखेर हा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला आणि सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाच्या तपासाला सीबीआयला परवानगी दिली. पण, आता या प्रकरणात एम्सच्या डॉक्टरांनीही सुशांतची हत्या झाली असावी, हे नाकारलं आहे.





Comments