शिक्षण विभागातून पवित्र पोर्टलची फाईलच गायब

 


भाजप सरकारच्या काळात शिक्षक भरतीसाठी तयार करण्यात आलेली पवित्र पोर्टलची फाईल शिक्षण विभागातून गायब झाल्याने शिक्षक भरती पुन्हा वादात सापडण्याची शक्यता आहे. उमेदवारांमधून मात्र याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शिक्षकांच्या मेगा भरतीसाठी पवित्र पोर्टल निर्माण करण्यात आले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित शाळांमधील दहा हजार शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलचा अवलंब करण्यात येत होता. या भरतीसाठी निवड यादी प्रकाशित करण्यात आली होती. त्यासाठी १६ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर शिक्षक भरतीबाबत अनेक तक्रारी पुढे आल्याने भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती. शिक्षक भरती प्रक्रियेत घोळ झाल्याचे व्यवहार झाले असून, काही शिक्षक संघटनांनी याबाबत न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाला पवित्र पोर्टलबाबत माहितीच्या आधारे बाजू मांडायची असताना संबंधित फाईल हरवली असल्याने विभागामध्ये शोधाशोध सुरू आहे. शिक्षण विभागाच्या गलथान प्रकाराबाबत उमेदवारांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

आधीच भरती प्रक्रिया रेंगाळली असतानाच त्यातच फाईल गहाळ झाल्याने भरती आणखी लांबण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. एकूणच शासन शिक्षक भरतीबाबत उदासीन असून, उमेदवारांवर अन्याय करीत आहे.

अनेक रिक्त जागांचा घोळ

मुलाखतीशिवाय भरती करण्यात येणाऱ्या माजी सैनिकांच्या १२०० जागा रिक्त असून, त्याला एक वर्ष उलटले आहे. त्या जागांसह, रिक्त, अपात्र यांच्या एकूण १,४०० जागा येणे अपेक्षित आहेत. संस्थांच्या ३,००० जागांचा राऊंड होणे आहे. शिवाय मागासवर्गीयांच्या अन्यायकारक कपातीच्या जागा भरणे आवश्यक आहे. त्याबाबतही निर्णय घेणे आवश्यक आहे.

वेळकाढू धोरण

प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे संस्थेच्या मुलाखतीसह भरती प्रक्रियेला विलंब झाला आहे. १०:१ या प्रमाणात अभियोग्यताधारक उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. निवड झालेल्या उमेदवारांना १० संस्थांमध्ये मुलाखतीसाठी संधी उपलब्ध होईल. या प्रक्रियेला बराच कालावधी लागेल. त्यामुळे १० वर्षे रखडलेली भरती सुरू होऊन ३ वर्षे झाली तरी प्रक्रिया रडतखडत सुरू आहे.

Comments