अनधिकृत वस्त्यांना सुविधा

 

पालघर तालुक्यातील अनेक अनधिकृत बांधकामे असलेल्या सरावली गावामध्ये अनधिकृत बांधकामांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संरक्षण मिळत असल्याचे समोर आले आहे. अशाच एका अनधिकृत उभ्या राहिलेल्या वस्तींना ग्रामपंचायतकडून सुविधा दिल्या जात आहे. येथील अनधिकृत वस्तीला पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सरावली ग्रामपंचायत हद्दीत अवधनगर, आदर्श नगर, भैया पाडा अशा अनेक भागात सरकारी जागेवर अनधिकृत बांधकामे हजारोंच्या संख्येने उभी राहिली आहेत. स्थानिक महसूल विभाग व ग्रामपंचायतीच्या पाठिंब्यामुळे व त्याला मिळालेल्या राजकीय पाठबळामुळे अनधिकृत बांधकामाचे लोण वाढले आहे. या एका ग्रामपंचायतीच्या हद्दीत सरकारी जागेवर सुमारे पाच हजारपेक्षा अधिक अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. यातच येथील आजवर निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक राजकीय पक्षाच्या नेत्यांची चाळीची बांधकामे सर्वाधिक प्रमाणात असून त्या ठिकाणी भाडेतत्त्वावर परप्रांतीय कामगारांना रूम दिल्या जातात.

अशा अनधिकृत चाळींना नळ पाणीपुरवठा व्हावा, यासाठी एका स्थानिक नेत्याने उद्योगमंत्री यांच्याकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची ५०० चौरस मीटर जागा पाण्याची टाकी बांधकाम करण्यासाठी मंजूर करून दिली आहे. मात्र गावातील इतर स्थानिक वस्त्यांना व इतर गावातील नागरिकांना कचरा व्यवस्थापन व खेळाच्या मैदानासाठी जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी फाईल अनेक वर्षांपासून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे धूळ खात पडून आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्राच्या आजूबाजूला असलेल्या बोईसर, खैरापाडा, पाम, कोलवडे, पास्थळ व सालवड अशा अनेक गावांचा कचरा व्यवस्थापन प्रश्न गेल्या १० वर्षांपेक्षा अधिक काळापासून प्रलंबित आहे. कचरा व्यवस्थापन करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे जागेची मागणी केली जात आहे. जिल्हा प्रशासनाने देखील याबाबत पत्रव्यवहार केला असून आजवर या मागणीकडे उद्योग विभागाकडून कधीही सकारात्मक विचार केला गेला नसल्याचे दिसून आले आहे. असे असले तरी अनधिकृत बांधकामे होत असलेल्या ठिकाणी सरकारी जागा भूमाफिया कब्जा करत असताना अशा अनधिकृत वस्त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी एवढा खटाटोप का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

याच भागातील अनधिकृत वस्त्यांना पाणीपुरवठा गेल्या तीन चार वर्षांपासून ग्रामपंचायत चोरटय़ा पद्धतीने करत असल्याचे याअगोदर उघड झाले होते. परंतु पाणी चोरी करणाऱ्या ग्रामपंचायतीवर कुठल्याही प्रकारची फौजदारी कारवाई औद्योगिक विकास महामंडळाकडून करण्यात आली नाही. यामुळे तारापूर येथील महामंडळ हे सत्ताधारी पक्षांच्या स्थानिक नेत्यांच्या इशारावर चालते का असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

मतदारसंघ अबाधित राहण्यासाठी तयारी

सरावली ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या अवधनगर, भैयापाडा, आदर्श नगर व ओमसाई नगर या सरकारी जागेवर उभ्या राहिलेल्या वस्त्या स्थानिक नेत्यांनी उभारल्या आहेत. या ठिकाणी चाळीचे बांधकाम करून त्या बांधकामांना घरपट्टी व इतर सुविधा ग्रामपंचायतीकडून उपलब्ध करून घेतले जातात. स्थानिक ग्रामपंचायत सदस्य यांचे देखील या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे याच भागात असल्याने अशा अनधिकृत बांधकामांना रस्ते, गटारे, रोड लाईट व नळ पाणीपुरवठा अशा सुविधा पुरविल्या जातात.

सरकारी जागेवर असलेल्या अनधिकृत बांधकामावर महसूल विभागाने कारवाई करणे अपेक्षित आहे. त्याठिकाणी मोठय़ा प्रमाणात लोकवस्ती असल्याने आम्ही सुविधा पुरवतो. तसेच ग्रामपंचायतीने या भागात पाण्याची टाकी उभारण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे मागणी केली होती. ग्रामपंचायत सदस्य यांच्या अनधिकृत बांधकामे बाबत माहिती याअगोदर जिल्हा प्रशासना कडे पाठविण्यात आली आहे.
— सुभाष किणी, ग्रामविकास अधिकारी सरावली

Comments