हाथरस प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांना यूपीला पाठवावे, शिवसेनेची मागणी
उत्तर प्रदेशमध्ये हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटले आहे. ठिकठिकाणी विरोधीपक्षाकडून आंदोलन करून निषेध केला जात आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांना द्यावा, अशी मागणी केली आहे.शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ट्वीटकरून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे या प्रकरणाच्या तपासाबद्दल विनंती केली आहे.'देशाला संतप्त करणाऱ्या, मानवतेला काळीमा फासणाऱ्या हाथरस घटनेची पारदर्शक चौकशी न करता योगी सरकारने अत्यंत बेजबादारपणे, अमानवी पद्धतीने ती हाताळल्याचे दिसत आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरसमधील निर्भयाचा अमानुष बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा गुन्हा मुंबईत दाखल करून मुंबई पोलिसांना उत्तर प्रदेशला पाठवावे, अशी मागणी सरनाईक यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.काही दिवसांपूर्वीच सुशांत सिंह राजपूत प्रकरणात भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. बिहारमधील पाटनामध्ये पोलीस तक्रार दाखल करून बिहार पोलीस तपासासाठी मुंबईत पोहोचले होते. एवढंच नाहीतर या प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी भाजपने केली होती.आता याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनंही हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणावरून योगी सरकारवर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसही आक्रमक
दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने योगी सरकारवर सडकून टीका केली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी हाथरस प्रकरणावर निषेध केला आहे. 'हाथरसमध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे. कुठल्याही पक्षाचे सरकार असेल अशा घटना घडल्या नाही पाहिजेत. केंद्र सरकारने त्यासाठी कायदा करण्याची गरज आहे जेणेकरुन असा प्रकार करणारे दहा वेळा विचार करतील', असं अजितदादा म्हणाले.

Comments
Post a Comment